आज लिहायला बसायला मी वेगवेगळी ठिकाणं निवडली आहेत.. म्हणजे मी बसले आहे एकाच ठिकाणी; पण आजूबाजूची ठिकाणं वेगानं बदलत आहेत. थोडक्यात पुणे ते मुंबई हा प्रवास माझा सुरू आहे.. मागचा लेख लिहून झाल्यानंतर मधले पंधरा दिवस कुठं गेले कळलंच नाही..
आणि त्याला महत्त्वाचं कारण म्हणजे दोन जूनला आम्ही ‘मना’चे श्लोक’ या माझ्या लेखन व दिग्दर्शकीय दुसऱ्या सिनेमाची अनाउन्समेंट केली. लग्न दोन महिन्यांवर आलेलं असलं म्हणजे घरामध्ये जी घाई सुरू असते, तसंच काहीसं सिनेमाच्या प्रदर्शनाच्या आधी सुरू असतं..
सिनेमाच्या प्रीमियरला कोणाकोणाला बोलवायचं त्याची लिस्ट, लग्नामध्ये जशी केळवणं असतात तशी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये आम्ही आमच्या हक्काच्या माहेराला म्हणजेच वेगवेगळ्या वृत्तपत्रांच्या, वाहिन्यांच्या कार्यालयांना भेट देत असतो.. जसं लग्न ठरल्यानंतर वधू-वरांना प्रत्येक केळवणामध्ये सगळेजण उत्सुकतेनं ‘कसं वाटतंय’ हा प्रश्न विचारत असतात, आणि तेसुद्धा न थकता हसतमुखाने त्यांना वाटणाऱ्या गोष्टी सांगत असतात.. तसंच काहीसं सिनेमाच्या वेळीसुद्धा कलाकारांचं आणि दिग्दर्शकाचं झालेलं असतं..
दिग्दर्शकाची आणि प्रोड्युसरची अवस्था ही आई आणि बाबांसारखी असते.. काही वर्ष लाडात वाढलेलं आपलं पोर, ज्याच्यासाठी प्रसंगी खस्ता खाल्ल्या आहेत, कर्ज काढून शिकवलंय, मोठं केलंय.. पण त्याला मात्र काही कमी पडू दिला नाही आहे, असं आपलं पोर - म्हणजेच आमच्यासाठी सिनेमा - हा स्टुडिओचं माप ओलांडून प्रेक्षकांच्या घरामध्ये जाणार असतो. अर्थातच उत्सुकता, हुरहूर, काळजी, शंका हे सगळं वाटत असतंच; पण त्याहून जास्त ते त्याच्या - हक्काच्या - घरात जातं त्याचा आनंद मोठा असतो.
दोन जूनला टायटल अनाउन्समेंट ठरली होती.. अर्थातच त्याच्या आधी चार-पाच दिवस उत्सुकतेपोटी, आनंदापोटी आणि अर्थातच असंख्य कामं असल्यामुळे झोप नावाचा प्रकार आयुष्यातून गेला होता. आपला सिनेमा येतो आहे हे प्रत्येकाला कळवणं असेल किंवा तो घराघरांमध्ये कसा पोहोचवायचा यासाठीच्या चर्चा असतील (कारण सध्या सिनेमा बनवणं सोपं आहे; पण त्याला प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवणं हे कर्मकठीण) काय सांगायचं, काय सांगायचं नाही अशा चर्चा असतील... एरवी माझ्यासमोर महाबळेश्वरच्या निसर्गाचा स्क्रीन असतो.
त्याची जागा लॅपटॉप आणि मोबाईलच्या स्क्रीननं घेतली होती. एक जूनची रात्र तर मी अक्षरशः जागी होते. माझ्यासाठी चित्रपटाची अनाउन्समेंट म्हणजे साखरपुडा झाल्यासारखं होतं. उत्सुकता, आनंद, हुरहूर या भावना छातीमध्ये तांडव करत होत्या! या सगळ्यांमध्ये एकच गोष्ट मला शांत ठेवत होती ती म्हणजे पहाटे उठून मी, स्वप्नील, कार्बन आणि हनिवा खूप दिवसांनी महाबळेश्वरला जात होतो.
शेतावरत बसूनच मी ‘मना’चे श्लोक’चं क्रिएटिव्ह सोशल मीडियावर अपलोड केलं. सिनेमाबद्दल या लेखात मी फार काही सांगणार नाही.. अर्थातच माझी अँक्झायटी शिगेला पोचली होती.. आणि.. स्वप्नीलनं माझ्या हातातून मोबाईल काढून घेतला.
माझं डोकं फिरलं, ‘स्वप्नील, प्लीज मी टाईमपास करत नाहीये फोनवर! काम चालू आहे, लोक स्टोरी पोस्ट करतायत, टॅग करतायत. मला प्रत्येकाला उत्तर दिलं पाहिजे..’ मी जवळजवळ त्याच्यावर ओरडले.. (किंवा नेहमीसारखी त्याच्यावर ओरडले) त्यावर तो तितक्याच शांतपणे म्हणाला, ‘पंधरा मिनिटांनी उत्तर दिलं तर जग थांबणार नाहीये..
पण या क्षणी तू इतकी हायपर आहेस, की तुला थांबायची गरज आहे. माझ्याबरोबर खाली चल. शेतात चक्कर मारून येऊ आणि मग परत काम सुरू कर..’ अर्थातच त्याच्या बोलण्यात तथ्य होतं.. आणि तो मोबाईल परत देईल असंही वाटत नव्हतं! आम्ही शेतात चक्कर मारायला निघालो. प्रत्येक झाडामध्ये बदल झाले होते.
नवी पालवी फुटली होती. पेरूच्या झाडांना फळं लागली होती. आमच्या मदतनीस स्वप्नानं वावरात मेथी लावली होती, ती तरारून वर आली होती... आमचा ‘गब्बर’ कोंबडा शेवटचं पाहिलं त्याहून अधिक टग्या झाला होता.. बाकी दोन्ही कोंबड्या छान अंडी द्यायला लागल्या होत्या.. अर्थातच शेतात गेल्यानंतर आमच्या सूचनांना सुरुवात झाली..
इकडे नीट आळं बांधा, पावसाळ्यामध्ये पाण्याची वाट इकडून काढा, एखादं झाड वाऱ्याच्या झोतानं कललं असेल, तर त्याला काठ्यांनी बांधा.. काही छोटी झाडं गवतामध्ये लपून गेली होती त्यांच्या आजूबाजूचं गवत साफ करून त्याला दगडाचं आळं करा.. अशा कामांना सुरुवात झाली.. ढगांचा आणि उन्हाचा खोखोचा खेळ चालूच होता..
कार्बन आणि हनीवाला भेटायला ‘फेविकॉल’ मध्येच कुठून तरी धावत धावत आला.. अर्धा तास त्या तिघांनी जवळजवळ ‘भरत भेट’ घडली की काय असं वाटावं - इतक्या आनंदानं एकमेकांवर उड्या मारणं, गवतात लोळणं, मध्येच येऊन आमच्या अंगावर उड्या मारणं हे सगळं करून दाखवलं.. अर्थातच माझ्या शेतानं पुन्हा एकदा डॉक्टरचं काम केलं होतं..
हुरहूर किंवा काळजी ही आनंदामध्ये बदलली होती.. जरी माझीच फिल्म असली, तरी तासभर मी मोबाईलपासून दूर राहिले म्हणून लोकांच्या आयुष्यात काहीही फरक पडला नव्हता. पण तासभर मी मोबाईलपासून दूर राहिले म्हणून माझ्या वाटण्यात जमीन-अस्मानाचा फरक पडला. सगळं शेत फिरून घरात वर जाताना स्वप्नीलला फक्त ‘थँक्यू’ म्हणाले..
आणि तो म्हणाला, ‘आपण जे जगतोय तीच तर तुझी फिल्म आहे... ‘मना’चे श्लोक’!’
कुठल्याही सिनेमाचा प्रवास हा एखाद्या नदीसारखा असतो.. उगमापासून म्हणजेच कथेच्या बीजापासून सुरू होऊन कधी खळखळता, कधी शांत, कधी अडथळ्यांची शर्यत पार करत समुद्रास मिळणारा.. सिनेमाचं लोकार्पण झालं की समुद्रास मिळाल्याचंच समाधान मिळतं... पुढच्या लेखापासून, माझ्या मनातल्या या गोष्टीचा, निसर्गासोबत सुरू झालेला प्रवास, तुम्हाला सांगायला आवडेल!