ढिंग टांग : टाळ्या आणि थाळ्या..!
esakal June 05, 2025 12:45 PM

टळटळीत दुपार होती. प्रचंड गदमदत होते. ‘शिवतीर्थ’गडावर छताचा पंखा फुल्ल स्पीडने फिरत होता. पंख्याखाली ‘स्सस्सस्स’ ऐसा ध्वनी ऐको आला. खुद्द राजेसाहेब वाऱ्याखाली विसावा घेत होते. थोड्या वेळाने त्यांनी फर्जंदास हांक मारोन शीतकपाटातील थंड पाणी मागवले.

‘छे, भलतंच उकडतंय..,’ राजेसाहेब वैतागून म्हणाले.

‘हो ना, काय हा उकाडा म्हणायचा का काय,’ फर्जंद निष्ठेला जागून व्यक्त झाला. नकळत त्याचाही हात स्वत:च्याच सदऱ्याच्या बटणाशी गेला. पण लागलीच भानावर येऊन त्याने स्वत:स सावरले. नुकतेच जेवण झाले होते.

भरल्यापोटी मुंबईतला उकाडा अधिकच जाणवतो. ‘एकदा आमच्या हातात सत्ता देऊन बघा, हा उकाडा पळवून लावीन कुठल्याकुठं..,’ राजेसाहेब स्वत:शीच म्हणाले. हे बाकी खरे होते. राजेसाहेब गेली कित्येक वर्षे एकहाती सत्ता मागताहेत. पण लोक लेकाचे नतद्रष्ट. भाषणांना गर्दी करितात, पण मते? ती कोण देणार? राजेसाहेब मनातल्या मनात चडफडले…

‘बांदऱ्याहून दूत आला आहे, आपली भेट हवी म्हणतो,’ फर्जंदाने वर्दी दिली.

‘काय काम आहे? उद्या या म्हणावं,’ राजेसाहेब कटकटून म्हणाले.

‘टाळी हवी असा निरोप आहे म्हणे!’ फर्जंदाने चाचरतच निरोप दिला. राजेसाहेबांना आठवले. आपल्याच मुलाखतीमुळे ही टाळीची पीडा मागे लागली, हे त्यांना आठवले. कुठून ती मुलाखत दिली, असे त्यांना मनोमन वाटून गेले. महाराष्ट्रासमोर दोन्ही भावांचे मनोमीलन ही किरकोळ बाब आहे, ऐसे बोलून त्यांनी टाळीचा अंक सुरु केला होता. मग बांदऱ्याच्या थोरल्या पातीनेही ऊर्फ उधोजीसाहेबांनीही पन्नास अटी घालून टाळी देईन, असे जाहीर सांगितले होते.

तेही राजेसाहेबांना आठवले. आम्ही टाळी दिली तर बंगल्यावर भोजनासाठी इतरांना बोलवायचे नाही, अन्य पंचतारांकित ठिकाणी इतरांसोबत भोजनाला जायचेही नाही. कुणाला भेटायचे नि कुणाला खेटायचे हे आम्ही ठरवणार! हे मान्य असेल तर टाळी काय, गोड गोड गोळीही हातावर देऊ, अशा शेपन्नास अटी बांदऱ्यातील उधोजीसाहेबांनी घातल्या होत्या.

गोड गोड गोळीचे नाव काढताच राजेसाहेबांच्या जिभेवर कडवट चव आली…हे सारे त्या भांडुपचे शिलेदार संजयाजीमुळे चालले आहे. एप्रिलमधल्या सहकुटुंब परदेश दौऱ्यांमुळे सारे काही थंडावले होते. पण या संजयाजींनीच टाळीचा विषय विनाकारण जिवंत ठेवला आहे. नॉन्सेन्स!

‘त्यांच्या अटीशर्ती मान्य करुन बिलकुल टाळी देणार नाही, टाळीच काय साधं बोटदेखील देणार नाही, ज्जा!,’ राजेसाहेब उगाचच भडकले. एका टाळीच्या बदल्यात अवघे स्वातंत्र्य गहाण ठेवण्याची अट त्यांच्या स्वाभिमानी मनाला शंभर इंगळ्यांसारखी झोंबली.

‘महाराष्ट्रासाठी कोणीही आमच्यासोबत आलं तरी आम्हाला चालणार आहे, असं राजपुत्र चि. विक्रमादित्यांनीही स्पष्ट केलंय. हा थेट सांगावा आहे, साहेब!

परतीचा मार्ग बंद झाला आहे, आता टाळीचा विषय पुढे घ्यावा लागणारच, साहेब!’ फर्जंदाने परिस्थितीची जाणीव करुन दिली.

‘अरे बापरे! चि. विक्रमादित्य म्हणजे आमचेच सख्खे पुतणे! आता पुतण्याचे ऐकले पाहिजे, नाही का?,’ गरागरा फिरणाऱ्या पंख्याकडे एकटक पाहात राजेसाहेबांनी तंद्रीतच विचारले.

‘हो ना! टाळीची टाळाटाळी कितीही टाळलीत तरी टळणार नाही, असंच मातोश्रीचा दूत सांगतो आहे!,’ फर्जंदाने पुस्ती जोडली. ‘एकंदरित यंदा ते टाळी घेतल्याशिवाय राहणार नाहीत, असं दिसतंय!’ राजेसाहेबांनी आडाखा बांधला.

‘हो ना! काय करायचं?’ फर्जंद हुशार निघाला...

काहीएक धोरणात्मक विचार (पुरेसा) करोन राजेसाहेब निर्णायक सुरात उद्गारले, ‘देऊन टाकू टाळी, पण एका अटीवर! टाळ्या मोजा, पण आमच्या ‘शिवतीर्था’वर कोणीही जेवायला आलं तरी थाळ्या मोजत बसायचं नाही!!

चालेल?’’

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.