आरसीबीच्या विजयी रॅलीवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला. तर ५० जण जखमी झाले आहेत. या घटनेत मृत्यू झालेल्या एका तरुणाच्या कुटुंबियांनी आमच्या मुलाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करू नका, त्याचा मृतदेह परत द्या अशी विनंती केलीय. यावेळी त्यांना अश्रू रोखता आले नाहीत.
मृत्यू झालेल्या तरुणाच्या वडिलांनी म्हटलं की, माझा एकच मुलगा होता, आता तो राहिला नाही. त्याचा मृतदेह मला परत द्या. शवविच्छेदन करू नका. त्याच्या शरिराला तुकड्या तुकड्यात कापू नका अशी विनवणी तरुणाच्या वडिलांनी केलीय.
तरुणाच्या वडिलांनी अधिकाऱ्यांना विनवणी केली की मला त्याचा मृतदेह द्या. आता त्याच्यावर किमान अंत्यसंस्कार नीट करू दे. मला न सांगता इथं येऊन सेलिब्रेशन पाहण्याचा त्यानं निर्णय घेतला होता. पण आता काही वाचलं नाही. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री, आता कुणीही माझा मुलगा परत आणून देऊ शकत नाही
चिन्नास्वामी स्टेडियममध्ये विजयी रॅलीचं आय़ोजन करण्यात आलं होतं. या स्टेडियमची क्षमता ३५ हजार असून स्टेडियमबाहेर लाखोंच्या संख्येनं चाहते आले होते. मोफत तिकिट मिळणार असल्याच्या अफेवनंतर गेट नंबर ७ वर मोठी गर्दी झाली. यावेळी सायंकाळी पाचच्या सुमारास चेंगराचेंगरीची घटना घडली. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. काही जण बेशुद्ध पडले तर काहींना श्वास घ्यायला त्रास होत होता.