मंचर : “पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन ही काळाची गरज आहे. फक्त झाडं लावणं पुरेसं नाही, ती जगवणं हे अधिक महत्त्वाचं आहे. वृक्षामुळे निसर्ग साखळी जपली जाते, हवामानात समतोल राहतो व प्रदूषणावर नियंत्रण मिळते. त्यासाठी गावोगावी वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात होण्यासाठी सामुहिक प्रयत्न करावे.” असे आवाहन भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अॅड. प्रदीप वळसे पाटील यांनी केले.
आदर्शगाव गावडेवाडी- अवसरी बुद्रुक (ता.आंबेगाव) येथे घोड प्रकल्प वनविभाग जुन्नरच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गुरुवारी (ता.५) बिबट शीघ्रकृती दल केंद्र इमारतीचे उद्घाटन प्रसंगी अॅड. वळसे पाटील बोलत होते. यावेळी जुन्नर विभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते, उपवनसंरक्षक स्मिता राजहंस, मंचरचे वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले, आदर्शगाव गावडेवाडीचे सरपंच विजय गावडे, अवसरी बुद्रुकच्या सरपंच सारिका हिंगे, उपसरपंच अनिल हिंगे, कल्याण हिंगे, आजित चव्हाण व प्रशांत वाडेकर उपस्थित होते.
सातपुते म्हणाले, “माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील व म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलेल्या सुचनेनुसार गावडेवाडी-अवसरी बुद्रुक येथे बिबट शीघ्र कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. या दलाचा फायदा बिबट्यांचे हल्ले रोखण्याबरोबरच हल्ला झाल्यास तातडीने उपचार सुविधा मिळण्यासाठी पूर्वपट्ट्यातील गावांना होणार आहे. या ठिकाणी सुसज्ज वनउद्यान ऊभे करण्याचा प्रस्ताव तयार केला जाईल. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी देखील सुसज्ज वसाहत उभारणार आहे.”
अमृत शिंदे यांनी प्रास्ताविक केले. सोनल भालेराव यांनी सूत्रसंचालन व विकास भोसले यांनी आभार मानले.
“आंबेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बिबटे आढळून येत आहेत. बिबट्या आपला सहकारी झाला आहे. त्याला बरोबर घेऊनच आता आपल्याला जगावे लागणार आहे. शेती, पाणी व वन्यजीव यांचा परस्परसंबंध टिकवायचा असेल तर मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड व त्याचे संवर्धन झाले पाहिजे.”
अॅड. प्रदीप वळसे पाटील, उपाध्यक्ष, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना