पुणे - उधार दिलेले पैसे परत न दिल्याच्या कारणावरून एका ४० वर्षीय महिलेचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची घटना धायरीतील रायकरमळा परिसरात घडली. नांदेडसिटी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
श्यामली कमलेश सरकार (वय-४०, रा. सूर्य उज्ज्वल हाइट्स, जाधवनगर, रायकरमळा) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून, नितीन चंद्रकांत पंडित (वय-५१, रा. निसर्ग हाइट्सजवळ, धायरी) असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिस अंमलदार नीलेश तनपुरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपी नितीन पंडित याने श्यामली सरकार यांना काही रक्कम उधार दिली होती. मात्र, श्यामल यांनी ती रक्कम परत न केल्याने दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी रागाच्या भरात आरोपीने ओढणीने श्यामली यांचा ओढणीने गळा आवळून खून केला.
या घटनेची माहिती मिळताच नांदेडसिटी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) गुरुदत्त मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.