नवी दिल्ली : कोणत्याही स्थितीत भारत दहशतवाद सहन करणार नाही आणि तसे धोरण असून आमच्या सहकाऱ्यांनी ते समजून घ्यावे, अशी अपेक्षा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज भारत दौऱ्यावर आलेले ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड लॅमी यांच्याशी द्विपक्षीय चर्चेदरम्यान संवाद साधताना व्यक्त केली.
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या दहशतवादविरोधी लढ्यात साथ दिल्याबद्दल जयशंकर यांनी ब्रिटनचे आभार मानले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या संघर्ष विरामाचे ब्रिटनने समर्थन केले आहे. भारत-पाकिस्तानदरम्यानचा लष्करी तणाव कमी व्हावा म्हणून ब्रिटन दोन्ही देशांच्या संपर्कात होता. पाकिस्तानने संघर्षविराम कायम ठेवावा, असे आवाहन लॅमी यांनी केले.
दोन दिवसांचा पाकिस्तान दौरा आटोपून डेव्हीड लॅमी आणि त्यांचे शिष्टमंडळ भारतात दाखल झाले आहे. लॅमी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत करताना जयशंकर यांनी पाकिस्तानकडून होत असलेल्या सीमापार दहशतवादी कारवायांचाही मुद्दा उपस्थित केला. दहशतवादाविरुद्ध आमचे शून्य सहिष्णुतेचे धोरण आहे. दहशतवादी आणि त्यांच्या हल्ल्यांना बळी पडणारे पीडित यांना एकाच पारड्यात मोजावे असे भारताला कधीच वाटणार नाही, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले. भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार हा खऱ्या अर्थाने मैलाचा दगड ठरला आहे.
लॅमी यांच्यासोबत दहशतवादासह द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा झाली असून व्यापार, संरक्षण, शिक्षण आणि तंत्रज्ञानासह विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्याविषयी सहमती झाल्याचे जयशंकर म्हणाले. डेव्हीड लॅमी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. या बैठकीला जयशंकरही उपस्थित होते. भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील ब्रिटनमध्ये गेलेल्या आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळाने भारताविरुद्ध दहशतवादी कारवायांना साह्य करणाऱ्या पाकिस्तानचे मनसुबे उघड केले होते.
राजनाथसिंहाचा लेख मोदींकडून पोस्टसंरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सीमापार दहशतवादाबाबत शून्य सहिष्णुतेचा पुनरुच्चार करणारा लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर ट्विट केला. भारतावरील कोणत्याही हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल. दहशतवादी आणि त्यांना सहकार्य करणारे यांच्यात कोणताही भेद केला जाणार नाही, असे या लेखात संरक्षण मंत्र्यांनी ठाम प्रतिपादन केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. भारत दहशतवादी कारवाया सहन करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.