दुष्काळी 'वनोजा' आता 'ऑरेंज व्हिलेज'
esakal June 08, 2025 12:45 PM

वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा गाव. गावाला दुष्काळ पाचवीला पुजलेला, उजाड माळरानावर घोंगावणारा वारा आणि जमिनीची काहिली करणारं दाहक ऊन्ह. मात्र गेल्या दहा वर्षांत या गावानं फळबागेची वाट निवडल्याने आता संत्रा बाजारपेठेत जगाच्या नकाशावर आलं आहे. पाण्याचे अचूक नियोजन आणि युवा पिढीने तंत्रज्ञानाच्या साथीने हे गाव विदर्भाचा कॅलिफोर्निया अशी ओळख निर्माण करत आहे.

मंगरुळपीरपासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या वनोजा गावाने चार दशकांपासून शैक्षणिक वारसा जोपासला होता. डॉ. पंजाबराव देशमुख, संत गाडगेबाबांनी या गावाच्या मातीची वैचारिक मशागत केली होती. त्यामुळे या आडवळणाच्या गावात दोन कॉलेज, चार वसतिगृह आहेत. हजारो विद्यार्थ्यांशी हे गाव जोडलं गेलंय.

मात्र दुसऱ्या बाजूला कोरडवाहू शेती, हिवाळ्यातच विहिरींनी गाठलेला तळ ही दुसरी बाजू भयावह होती. पाण्यासाठी चार महिने पायपीट करावी लागत असताना गावात बागायती फळबाग हे गावासाठी एक स्वप्न होतं. मात्र १० वर्षांपूर्वी गावातील काही शेतकऱ्यांनी एक बदल म्हणून शेतात संत्रा लागवड केली.

अनेकांनी या शेतकऱ्यांची हेटाळणी केली. मात्र तीन वर्षांनंतर या संत्रा बागा बहरून आल्या. स्थानिक बाजारपेठेत विक्री झाल्यानंतर येणारा नफा पारंपरिक पिकांपेक्षा जास्त आल्याने अनेक शेतकऱ्यांनी हा प्रयोग सुरू केला.

या गावातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी पाणी व्यवस्थापन आणि आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करत मोठ्या संख्येने संत्रा फळांची लागवड केली. यापासून शेतकरी चांगले उत्पादनही घेऊ लागले. येथील फळांचा आकार, रंग, चव चांगली असल्याने राज्याबाहेर या फळांना मोठी आहे. यामुळे व्यापारी वर्गदेखील येथील फळबागांसाठी उत्सुकतेने पुढे सरसावले.

शेतकरी वळले फळबागेकडे

वनोजा हे गाव तसे पाहिले तर काही वर्षांपूर्वी दुष्काळग्रस्त म्हणून ओळखले जायचे. मात्र येथील शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन करत, चांगल्या प्रकारे संत्रा फळबागा फुलवल्या आहेत. येथील बऱ्याच शेतकऱ्यांनी सरकारी योजनेचा लाभ घेत, आपल्या शेतात शेततळं उभारले आहे.

त्यामुळे येथील बऱ्याच शेतकऱ्यांची पाण्याची समस्या मिटली आहे. येथील शेतकऱ्यांची यशस्वी संत्रा शेती पाहत आता परिसरातील भूर, पूर, शेंदुर्जना मोरे, येडशी, शेलुबाजार या गावांसह परिसरातील इतर शेतकरीही संत्रा फळबागेकडे मोठ्या संख्येने वळताना दिसत आहेत.

शेततळी ठरली वरदान

गावात आजही पाण्याचा कोणताही शाश्वत स्रोत नाहीत. मात्र शेतकऱ्यांनी यावर तोडगा काढला आहे. प्लास्टिक आच्छादनाची शेततळी गावाच्या विकासाचा मार्ग ठरला आहे. आज सहा हजार लोकवस्ती असलेल्या या गावात तब्बल सातशे शेततळी आहेत. पावसाळ्यात ही शेततळी भरून घेऊन उन्हाळा व बहर काळात या शेतकऱ्यांनी बागा जगविण्याचे तंत्र आत्मसात केले. पाण्याचा काटेकोर वापर करून समृद्धी खेचून आणली.

परदेशात वाजला डंका

मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा गावातील संत्रा बागेला जानेवारी महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भेट दिली. नाशिक येथील सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या गुंतवणूकदार असलेल्या नेदरलँड्स येथील एफएमओ आणि अमेरिका येथील जीईएफ कंपनीचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. सह्याद्री फॉर्म्स कंपनी हे फळे आणि भाजीपाल्याच्या पुरवठा साखळीमध्ये कार्यरत आहे.

प्रामुख्याने दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांना मार्गदर्शन करणे, प्राथमिक प्रक्रिया तसेच इतर मूल्यवर्धन करून उत्पादने प्रमुख आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारपेठेत विक्री करण्याचे कार्य सह्याद्री फार्म्समध्ये केले जाते.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

वनोजा येथील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चांगल्या दर्जाचे संत्रा उत्पादन घेतात ही माहिती परदेशात माहीत झाल्याने या बागेची पाहणी करून परदेशी पाहुण्यांनी शेतकऱ्यांना भेटून संत्रा शेतीबाबत सविस्तर माहिती घेतली.

नेदरलँड्स येथील एफएमओ कंपनीचे मॅथिज व्हॅन बेव्हरवुर्डे आणि प्रोपार्को कंपनीचे फ्रान्स येथील एडवर्ड बफीर यांनी बागेची पाहणी करत, त्यांनी शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या येतात, कंपनीकडून अजून काय अपेक्षा आहेत, शेतकरी फवारणी कशा प्रकारे करतात, तसेच पाणी व्यवस्थापन इत्यादी बाबींची सखोल माहिती घेतली.

यानंतर शेतकऱ्यांसोबतच संत्रा तोडणी करणाऱ्या मजुरांशीही त्यांनी संवाद साधला. तसेच परदेशी पाहुण्यांनी येथील संत्राची चव चाखून समाधान व्यक्त केले. शेतकरी करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. या गावातील संत्रा बांगलादेश, नायजेरिया, नेपाळ या देशाच्या बाजारपेठेत ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे.

संत्र्यानं फुलविली हिरवाई

या गावात सध्या ७०० हेक्टर क्षेत्रावर संत्रा लागवड झाली आहे. काळी जमीन, आधुनिक तंत्रज्ञान वापरून केलेले पाण्याचे नियोजन या बाबी दर्जेदार संत्रा उत्पादनासाठी महत्त्वाच्या ठरल्या आहेत. तीन एकरातील संत्र्याला १६ लाखांपर्यंत दर मिळत असल्याने कधीकाळी कोरडवाहू असलेल्या शेतकरी आज लक्षाधीश झाला आहे.

संत्रा फळबागा पाहण्यासाठी परिसरातील, बाहेर जिल्ह्यातील शेतकरीही येत असतात. राज्याचे कृषी विभागाचे प्रधान सचिव, अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, सह्याद्री फार्म प्रोड्युसर कंपनीचे गुंतवणूकदार असलेल्या, नेदरलँड येथील एफएमओ आणि अमेरिका येथील जीईएफ कंपनीचे अधिकारी यांच्यासह अनेक अधिकारी यांनी येथील संत्रा फळबागांना भेटी दिल्या आहेत.

फळबाग योजनेचा फायदा

वनोजा गावची ओळख एक दुष्काळी गाव म्हणून होती. मात्र गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून गावातील युवकांनी तंत्रज्ञानाची कास धरून गावाचा कायापालट केला आहे. रोजगार हमी योजना फळबाग योजनेचा शेतकऱ्यांना खूप फायदा झाला आहे. आज गावातील दोन हजार शेतकरी संत्रा पिकाकडे वळले आहेत. आठ एकर क्षेत्रावर ४८ लाखांवर उत्पन्न घेतलेले अनेक शेतकरी गावात आहेत.

- गजानन विष्णुपंत राऊत, शेतकरी, वनोजा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.