प्रशांत ननावरे - nanawareprashant@gmail.com
नवी मुंबईतील गुप्ता कुटुंब ‘अनुपम पराठा’ हॉटेल चालवतात. कामगार वर्ग असो वा सुटाबुटातील कॉर्पोरेट कर्मचारी सर्वजण इथे मांडीला मांडी लावून वेगवेगळ्या प्रकारचे गरमागरम पराठे आणि शाकाहारी थाळीचा आस्वाद घेताना दिसतात. गुप्ता यांचा मुलगा अनुपम हा इंजिनिअर आहे; मात्र काही वर्षे नोकरी केल्यानंतर तोदेखील याच व्यवसायात उतरला आहे. दुसऱ्या कंपनीसाठी नोकरी करून पैसे कमविण्यापेक्षा आपल्याच व्यवसायासाठी मेहनत घेऊन लोकांना पौष्टिक जेवण खाऊ घालण्याचा आनंद त्याला अधिक महत्त्वाचा वाटतो...
मुंबई शहराच्या तुलनेत नवी मुंबई हे फारच नवीन शहर, त्यामुळे इथली आस्थापनेसुद्धा तितकीच नवीन आहेत. कोणतंही शहर वाढू लागलं, की सर्वप्रथम तिथे बाहेरून येणारा कामगार आणि कर्मचारी वर्गाची पहिली गरज ही अन्न असते. साहजिकच त्यांची भूक शमविण्यासाठी सर्वप्रथम लहान-मोठे खाऊ अड्डे तयार होतात. मोठी हॉटेल, रेस्टॉरंट किंवा कॅफे शहराला नंतर कॉस्मेटीक लूक देण्यासाठी उघडली जातात; परंतु आरोग्य आणि खिशाला बाधक ठरणार नाही असे ताजे आणि पारंपरिक पदार्थ मिळणाऱ्या जागा हीच शहराची खरी ओळख ठरते. नवी मुंबईतील सीवूड येथील ‘अनुपम पराठा’ने हे आव्हान गेले दशकभर मोठ्या ताकदीने पेलल्याचे दिसते. कामगार वर्ग असो वा सुटाबुटातील कॉर्पोरेट कर्मचारी सर्वजण इथे मांडीला मांडी लावून वेगवेगळ्या प्रकारचे गरमागरम पराठे आणि शाकाहारी थाळीचा आस्वाद घेताना दिसतात.
सीवूड रेल्वेस्थानकाच्या अगदी समोर जयराम तुकाराम तांडेल मार्गावर डाव्या हाताला डॉन बॉस्को शाळा आहे. त्याच्या शेजारीच असलेल्या सद्गुरू प्राईड या इमारतीमधील गाळ्यांमध्ये पूर्वी अनेक पराठेवाले होते; मात्र त्यातील बहुतांश पराठेवाल्यांकडे हॉटेल व्यवसायासाठी आवश्यक परवाने नव्हते. दहा वर्षांपूर्वी तुकाराम मुंडे नवी मुंबईचे आयुक्त असताना त्यांनी या सगळ्यांवर कारवाई केली; पण त्यामधून अधिकृत ‘अनुपम पराठा’ आजही कायम असून लोकांना जंक फूडपासून दूर ठेवत माफक दरात घरगुती पद्धतीचे पराठे खाऊ घालत आहेत.
उत्तर प्रदेशातील जॉनपूर येथून मुन्नालाल गुप्ता यांच्या मागच्या पिढीतील सदस्य पोटापाण्यासाठी मुंबईत आले आणि इथेच स्थायिक झाले. मुन्नालाल गुप्ता अगदी लहान वयात मुंबईत येऊन गोवंडी येथे स्थायिक झाले. तिथे त्यांनी दशकभराहून अधिक काळ दुधाची डेअरी चालवली. त्यातून मिळवलेल्या मिळकतीमधून सीवूड येथे गाळा घेतला आणि तो भाड्याने दिला. तिथे पराठे बनवण्याचं काम चाले; मात्र २०१५ साली गोवंडीला रामराम ठोकून मुन्नालाल गुप्ता कायमचे नवी मुंबईत आले आणि आपला मुलगा अनुपम याच्या नावाने ‘अनुपम पराठा’ची सुरुवात केली. त्या वेळी दुकानासमोर मोकळं मैदान होतं. आजूबाजूला भरपूर कन्स्ट्रक्शन्स सुरू होती. बहुतांश कामगार वर्ग हा उत्तरेकडील असल्याने त्यांना आपल्या चवीचे आणि पद्धतीने जेवण माफक दरात मिळत असल्याने तिथला कामगार वर्ग येथे पराठा खायला येत असे. गेल्या दहा वर्षांत तर कामगार आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांसोबतच आजूबाजूच्या परिसरातील लोकं सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीच्या जेवणासाठी ‘अनुपम पराठा’ला पसंती देतात.
बटाटा, कांदा, फ्लॉवर, बीट, गाजर, पालक, मेथी, सत्तू, मुळा, पनीर, चीज, मिक्स व्हेज असे वेगवेगळ्या प्रकारचे पराठे येथे मिळतात. बटाटा म्हणजेच आलू पराठ्यामध्ये जोडीला कांदा, फ्लॉवर, मेथी, पालक, मुळा, लसूण, चीज पराठे बनवले जातात. तीच गोष्ट कांदा आणि फ्लॉवरलादेखील लागू होते. भाज्यांच्या पराठ्यामध्ये चीज हा पर्याय वेगळा देण्यात आला असला तरी चार वेगवेगळ्या प्रकारचे चीज पराठेसुद्धा आहेत. त्यामध्ये अनुपम स्पेशल पराठ्यामध्ये पालक आणि लसूण घातली जाते. आलू पराठ्यासाठी बटाटे उकडून घेऊन त्यामध्ये गरम मसाला, लाल तिखट, कोथिंबीर, ओवा आणि मीठ याचं मिश्रण बनवून घेतलं जातं. कोणताही पराठा ऑर्डर आल्यावरच गरमागरम बनवून दिला जातो. इथल्या पराठ्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा आकार आणि किंमत. फक्त चाळीस रुपयांमध्ये हाताच्या दोन पंज्यांमध्ये मावणार नाही इतका मोठा पराठा समोर येतो. पराठा मोठा असला तरी जीभ चटके सोसत पराठा फस्त करून टाकते आणि लागलीच आपण आणखीन एका पराठ्याची ऑर्डर देण्यासाठी मेन्यू कार्ड शोधू लागतो.
पापड हा जेवणासोबत वेगळा खायचा पदार्थ; मात्र इथे पापड तळून त्याचा चुरा करून पराठ्यामध्ये लाटला जातो. उडदाच्या कुरकुरीत तळलेल्या पापडाची एक वेगळी चव पराठ्याला प्राप्त होते. गाजर, बीट, फ्लॉवर, मुळा यांचे पराठे बनवताना त्यातील पाण्याचा अंश काढून घेऊन नंतर त्यात मसाले मिक्स केले जातात. मेन्यूमध्ये पराठ्यांचे प्रकार दिले असले तरी नियमितपणे येणारे खवय्ये चीज, पनीर, लसूण, पापड हे पदार्थ आपल्या पद्धतीने त्यात समाविष्ट करण्यास सांगतात. त्यामुळे मेन्यूशिवाय स्वत:च्या आवडीनुसारसुद्धा पराठा बनवून घेता येतो. पराठ्यासोबत अनलिमिटेड दही, चटणी, लोणचं दिलं जातं. मुन्नालाल गुप्ता पूर्वी डेअरीच्या व्यवसायात असल्याने दररोज ताजं दही लावलं जातं. ज्याचा वापर ताक बनवण्यासाठीदेखील केला जातो. पराठ्यासोबत दिली जाणारी चटणी विशेष आहे. ज्यामध्ये पुदिना, पालक, हिरवी मिरची आणि टोमॅटोचा वापर केला जातो. टोमॅटोमुळे चटणीला थोडा आंबटपणा येतोच; पण त्यातील पाण्याच्या अंशामुळे वेगळं पाणी घालण्याची आवश्यकता भासत नाही. इथे एक महत्त्वाची नोंद करावीशी वाटते, की मुळातच पराठा चवदार असल्याने नुसता पराठा खाल्ला तरी त्याला कशाचीही सोबत लागत नाही. भरपूर स्टफिंग असलेला, पातळ लाटलेला आणि तव्यावरून थेट ताटात आलेला वाफाळलेला पराठा बघता बघता फस्त होऊन जातो.
पराठ्यासोबतच शाकाहारी थाळीचा पर्यायदेखील येथे उपलब्ध आहे. अवघ्या सत्तर रुपयांमध्ये भाजी-चपाती, वरण-भात, लोणचं, कांदा अशी भरपेट थाळी मिळते. पूर्वी ताटासोबत सुकी आणि ओली अशा दोन भाज्या दिल्या जायच्या; परंतु सर्वांनाच दोन्ही भाज्या आवडायच्या असं नाही. त्यातून अन्नाची नासाडी होऊ लागल्याने एकच पातळ भाजी दिली जाते. उत्तर भारतीय पद्धतीने तयार केल्या जाणाऱ्या भाज्या घरच्या चवीच्या असतात. कारण ते बनवण्याचं काम मुन्नालाल आणि त्यांची पत्नी उर्मिला स्वत: करतात. दररोज सकाळ-संध्याकाळ वेगळी भाजी असते. त्यामुळे नियमितपणे येणाऱ्या ग्राहकांना इथल्या जेवणाचा कंटाळा येत नाही. ज्यांना पराठे आणि थाळी खायची नाही त्यांच्यासाठी खास उत्तर भारतीय पद्धतीने तयार केलेले दाल फ्राय, पनीर भुर्जी, आलू-टोमॅटो, आलू जीरा, आलू फ्राय, टोमॅटो मसाला हे पर्याय उपलब्ध आहेत. काही लोक आपला जेवणाचा भाजी-चपातीचा डबादेखील इथे येऊन खातात आणि सोबत डाळ-भात घेऊन खातात. शिवाय, दही-भात, जीरा राईस, तवा पुलाव, मसाला राईस, मसाला खिचडी, गार्लिक फ्राईड राईस आणि पनीर फ्राईड राईस हे भाताचे प्रकारदेखील उपलब्ध आहेत.
सहज पाठ होईल असा इथला मेन्यू असला तरी रोज एक वेगळ्या प्रकारचा पराठा खाल्ला तरी महिना सहज निघून जाईल एवढ्या वेगवेगळ्या चवीचे पराठे येथे आहेत. गुप्ता यांचे संपूर्ण कुटुंब मिळून हा व्यवसाय करतं. गुप्ता यांच्यासोबत त्यांची पत्नी, मुलगा, सूनदेखील यात हातभार लावतात. संपूर्ण कुटुंबदेखील हॉटेलमध्ये तयार होणारंच जेवण जेवतं. घरी स्वत:साठी जेवण बनवलं जातं त्याप्रमाणे इथे जेवण बनतं, फक्त त्याचे प्रमाण जास्तीचे असते. गुप्ता यांचा मुलगा अनुपम हा इंजिनिअर आहे; मात्र काही वर्षे नोकरी केल्यानंतर तोदेखील याच व्यवसायात उतरला आहे. दुसऱ्या कंपनीसाठी नोकरी करून पैसे कमविण्यापेक्षा आपल्याच व्यवसायासाठी मेहनत घेऊन लोकांना पौष्टिक जेवण खाऊ घालण्याचा आनंद त्याला अधिक महत्त्वाचा वाटतो. ‘शुद्ध शाकाहारी घर का खाना’ या आपल्या टॅगलाइनला ‘अनुपम पराठा’ पुरेपूर न्याय देतं.