सायबर टोळीने उकळले ५० लाख
esakal June 08, 2025 09:45 PM

नवी मुंबई, ता. ८ (वार्ताहर) : इन्स्टाग्रामवरून एका अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री करणे ऐरोलीत राहणाऱ्या ४६ वर्षीय महिलेला चांगलेच महागात पडले. या महिलेने ज्या अनोळखी व्यक्तीसोबत इन्स्टाग्रामवरून मैत्री केली, त्या व्यक्तीने वेगवेगळी कारणे सांगून महिलेला ५० लाख रुपये पाठवण्यास भाग पाडून तिची फसवणूक केली आहे. रबाळे पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात टोळीविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.
फसवणूक झालेली ४६ वर्षीय महिला ऐरोली सेक्टर-९मध्ये राहण्यास आहे. वर्षभरापूर्वी तिची इन्स्टाग्रामवरून मुकेश नावाच्या व्यक्तीसोबत ओळख झाली होती. या ओळखीतून त्यांच्यामध्ये मैत्री झाल्यानंतर मुकेशने या महिलेचा मोबाईल नंबर घेऊन तिच्यासोबत व्हॉट्सॲपवरून चॅटिंग करण्यास सुरुवात केली. त्याने स्वत:विषयी माहिती देताना तो युकेमध्ये मोठ्या पदावर कार्यरत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने तिला भेटवस्तू म्हणून महागडे पर्स, परफ्युम, दागिने पाठविण्याचा बहाणा केला. त्यानंतर दोन दिवसांतच त्या टोळीतील सोनाली सिंग नावाच्या महिलेने दिल्ली विमानतळावरील कस्टम विभागातून बोलत असल्याचे सांगून या महिलेला संपर्क साधला. तसेच त्यांची भेटवस्तू दिल्ली विमानतळावर कस्टम विभागात आल्याचे सांगून ती सोडविण्यासाठी काही हजारांची रक्कम भरण्यास सांगितले. अन्यथा त्यांचे गिफ्ट परत जाईल, अशी भीती दाखविली. त्यामुळे या महिलेने तत्काळ ऑनलाइन पैसे पाठवून दिले.
-------------------
भेटवस्तूच्या हव्यासाने गमावले पैसे
सोनाली सिंग नावाच्या महिलेने गिफ्टच्या बॉक्सचे स्कॅनिंग करताना, पाउंड स्वरूपात रोख रक्कम सापडल्याचे सांगून त्याचा दंड म्हणून आणखी काही लाखाची रक्कम भरण्यास महिलेला भाग पाडले. अशा पद्धतीने सोनाली सिंगने वेगवेगळी कारणे सांगून या महिलेला सुमारे ५० लाख रुपये भरण्यास भाग पाडले; मात्र त्यानंतरदेखील महिलेकडून आणखी रक्कम भरण्यासाठी सतत फोन येऊ लागल्यानंतर आपली फसवणूक होत असल्याचे या महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर तिने रबाळे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात टोळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.