मुंबई : लोकसभा निवडणुकीत घवघवीत विजय मिळवलेल्या महाविकास आघाडीचा पाच महिन्यातच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव होतो हे अनाकलनीय आहे. रात्रीच्या अंधारात मतांवर दरोडा टाकून भाजपा युती निवडणूक आयोगाच्या मदतीने विजयी झाली आहे. राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर निवडणूक आयोग पुराव्यासह खुलासा का करत नाही, असा संतप्त सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी विचारला आहे. (Congress Nana Patole on Maharashtra Election and Rahul Gandhi allegations)
हेही वाचा : मराठी : राहुल गांधींचे आरोप म्हणजे गिरे तो भी टांग उपर, एकनाथ शिंदेंचा पलटवार
यासंदर्भात प्रतिक्रीया देताना नाना पटोले म्हणाले की, निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता 58.22 टक्के मतदान झाले, त्याच रात्री 11.30 वाजता ते 65.02 टक्के तर दुसऱ्या दिवशी 21 नोव्हेंबर रोजी हेच मतदान 66.05 टक्के झाल्याचे सांगितले, यात एकूण 7.83 टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. तब्बल 76 लाख मतांची ही वाढ असून मतदानाचा टक्का कसा वाढला? हा मतांवर सरळ सरळ दरोडा टाकलेला आहे. चंदिगड महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतपत्रिकेत कसा घोटाळा करून भाजपाला विजयी घोषित केले होते हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून जगाने पाहिले आहे. वारणसी लोकसभा मतदारसंघात सुरुवातीपासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर होते नंतर यंत्रणा कामाला लागली व निकाल वेगळा लागला हे उघड झाले आहे. निवडणूक काळात भाजपाच्या मर्जितील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कशी जबाबदारी दिली हेही उघड आहे. भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने निवडणूक जिंकलेली आहे. लोकशाहीला हा कलंक असून निवडणूक आयोगाच्या विश्वासाहर्तेवरही मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहे.
नाना पटोले पुढे म्हणाले की, काँग्रेसने मतांच्या चोरीचा प्रश्न उपस्थित केला असता भाजपा नेतेच त्याला उत्तर देत आहेत. नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः निवडणूक आयोगाची बाजू मांडली. आताही फडणवीस, बावनकुळे हे निवडणूक आयोगाची बाजू मांडत आहेत. भाजपाचे नेते निवडणुक आयोगाचे वकील आहेत का. शिर्डी मतदारसंघात 7 हजार मतदार कसे वाढवले याचे पुरावे आहेत. ज्या मतदारसंघात मतदारांची जेवढी मतदार संख्या बोगस पद्धतीने वाढविली तेवढेच मताधिक्य त्या मतदारसंघात भाजपाला मिळाले आहे. आम्ही पुराव्यानिशी मतदारयाद्यातील घोटाळा व बोगस मतदान दाखवतो, हिम्मत असेल तर भाजपा नेत्यांनी ते खोडून दाखवावे, असे आव्हान नाना पटोले यांनी दिले आहे.