बंगळूर : बंगळूरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर (Bengaluru Stadium stampede) झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेच्या तीन दिवसांनंतर, आरसीबीच्या सत्कार कार्यक्रमाच्या आयोजनाला विरोध दर्शवणारे विधानसौध सुरक्षाप्रमुखांनी लिहिलेले पत्र आता व्हायरल झाले आहे.
राज्य सरकारला (Karnataka Government) लिहिलेल्या पत्रात (RCB) खेळाडूंसाठी सत्कार कार्यक्रम आयोजित करण्याच्या धोक्यांबद्दल आधीच इशारा देण्यात आला होता. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या विरोधाला न जुमानता कार्यक्रम केला गेला. परिणामी, दोन अल्पवयीन मुलांसह ११ जणांचा मृत्यू झाला आणि अनेकजण जखमी झाले.
पोलिस उपायुक्त (काँग्रेस सुरक्षा) एम. एन. करिबासवन गौडा यांनी ४ जून रोजी वरिष्ठ अधिकारी, कार्मिक आणि प्रशासकीय सुधारणा विभागाचे सचिव जी. सत्यवती आणि इतर उच्च अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात कर्मचाऱ्यांची कमतरता आणि गर्दीचे व्यवस्थापन करण्यात येणाऱ्या आव्हानांचा इशारा दिला होता. ‘आरसीबीचे देशभर चाहते आहेत आणि जर आम्ही विधानसौधाच्या पायऱ्यांवर कार्यक्रम आयोजित केला, तर लाखो क्रिकेट चाहते सामील होऊ शकतात.
सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे, योग्य बंदोबस्त आयोजित करणे हे एक आव्हानात्मक काम असेल’, असे या पत्रात म्हटले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरसीबीच्या विजयानंतर शहरातील जल्लोषावर पोलिस लक्ष ठेवून होते आणि ३ जून रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत पोलिस कर्मचारी ड्युटीवर होते. त्यामुळे इतक्या कमी वेळेत इतका भव्य कार्यक्रम आयोजित करण्यास आधीच विरोध होता.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी चेंगराचेंगरीच्या घटनेसंदर्भात शहर पोलिस आयुक्त बी. दयानंद, अतिरिक्त पोलिस आयुक्त (पश्चिम) विकास कुमार, पोलिस उपायुक्त (मध्य) शेखर एच. टी. आणि इतर दोन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची घोषणा केली. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे (केएससीए) सचिव आणि खजिनदार यांनी राजीनामा दिला आहे.