सौंदाणे- नाशिकहून अमळनेरला निघालेले परिवहन महामंडळाची बस आणि मालेगाहून नाशिककडे निघालेल्या ट्रकची समोरासमोर धडक होऊन बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यात बसचे चालक आणि वाहकांसह चार जण गंभीर तर इतर वीस ते बावीस प्रवासी जखमी झालेले आहेत.
रविवारी (ता.८) दुपारी तीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. महामार्ग दुरुस्तीच्या कामामुळे सुरू असलेल्या एकेरी वाहतुकीबाबत कोणताही फलक अथवा दिशादर्शक अथवा गार्ड नसल्याने हा अपघात झाला आहे. यामुळे महामार्गावरील वाहतूक जवळपास अर्धातास ठप्प झाली होती. दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
महामार्गावर सध्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्याकरिता ठराविक टप्प्यात एक ते दीड किलोमीटरची मालेगावकडील वाहतूक नाशिककडून येणाऱ्या मार्गिकेत वळविली जाते. यानुसार हॉटेल फाउंटन ते नांदगाव फाटापर्यंत महामार्ग मालेगावच्या दिशेने एकतर्फी सुरू करून नाशिक दिशेने बंद करण्यात आला होता.
वाके शिवारात हॉटेल फाऊंटनसमोर नाशिकहून नाशिक -अमळनेर (एमएच १४, बीटी ३३२७, पिंपळगाव आगार) ही बस येत असताना मालेगाहून नाशिककडे जाणारा ट्रक (आरजे ११, जीसी ३६०८) पुढील मार्ग बंद असल्याने नाशिककडील लेनमध्ये येण्यासाठी अचानक वळाला आणि बसला जोरदार धडक दिली. यात बसच्या चालकाकडील भागाचा चक्काचूर झाला आहे.
या अपघाताचे वृत्त समजताच सौंदाणे, वाके, मुंगसे, टाकळी येथील पोलिस पाटील, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी प्रवाशांना बाहेर काढत मालेगाव येथे उपचारासाठी पाठविले.
अपघातातील जखमींची नावे ः चालक संजय अंकुश जाधव, वाहक आनंदा हिरामण गवळी तसेच प्रवासी रत्नाबाई एकनाथ कडनोर ( ५०, रा. मालेगाव), शोभाबाई बापू पाटील ( ५६, रा. निखुंडे, धुळे) हे गंभीर जखमी झालेले आहेत. इतर वीस ते बावीस प्रवासी जखमी झालेले असून त्यांची नावे समजू शकलेली नाहीत.
ना फलक, ना गार्ड तैनात
या परिसरात दोन महिन्यांपासून महामार्ग क्रमांक तीनचे दुरुस्ती व देखभालीचे काम सुरू आहे. ते करताना वाहतूक एकाचे बाजूने दोन्ही मार्गांची सुरू असते. ही वाहतूक जिथे वळविली जाते, तिथे ''रस्ता बंद आहे'', ''रस्त्याचे काम सुरू आहे'', ''वळण रस्ता सुरू होत आहे'' अशा प्रकारच्या कुठल्याही आशयाचे फलक लावलेले नसतात. किंवा गार्ड तैनात केलेला नाही. आज अपघात झाला जिथे दुभाजकाजवळ एखादा फलक अथवा कोणी मनुष्य, कामगार थांबलेला असता तर हा अपघात झाला नसता, असे स्थानिक ग्रामस्थ व प्रत्यक्षदर्शी यांच्यात चर्चा सुरू होती.
अपघातातील जखमी
भाऊराव पाटील (वय ८१, रा भडगाव), सरलाबाई मांडवडे (वय ६५), सूनंदाबाई पाटील,वय - ४१ रा धुळे, सुवर्णा शिनकर (वय ४२, जळगाव), मीनाबाई कोकाटे (वय ४० धुळे), कनिष्का पाटील (वय ३ नाशिक), जरीना शेख (वय ६० नाशिक), रितेश कोकाटे (वय १९ आर्वी), शबाना शेख (वय ४५), कैब शेख (वय २१), साजिद शेख (वय २१), तन्वीर पठाण (वय ९), सबा खान (वय १५, वडाळागाव नाशिक), रमाकांत वाणी (वय ७५), सिंदुबाई कुंभार (वय ४३, दहीवड चाळीसगाव), राजीव हडपे (वय ४३), सुनीता हडपे ( वय ४२), मंगल हडपे (वय ५०), सिताराम हडपे (वय ७० वाघळी), क्रांतीसिंग पवार (वय ६१ चिंचावड), सुमनबाई अहिरे (वय ६० वाघई), स्वाती साबळे (वय ५० धुळे), तायरा खान (वय ४४ नाशिक).