राजस्थानमधील गुजर निदर्शकांनी रेल्वे ब्लॉक केले
Marathi June 09, 2025 06:27 PM

वृत्तसंस्था/ जयपूर

राजस्थानातील भरतपूर जिह्यात रविवारी गुर्जर समुदायाची ‘महापंचायत’ संपल्यानंतर काही तासांतच समुदायाच्या लोकांनी जोरदार निदर्शने केली. याप्रसंगी रेल्वेरोको करताना एक प्रवासी ट्रेन रोखल्यामुळे सदर मार्गावरील रेल्वे वाहतूक कोलमडली होती. बयानाच्या पिलुपुरा भागातील कारबारी शहीद स्मारकात आयोजित महापंचायत संपल्यानंतर मोठ्या संख्येने लोक रेल्वे ट्रॅकवर आले आणि तेथून जाणारी एक प्रवासी ट्रेन रोखली, अशी माहिती देण्यात आली.

आरक्षणाशी संबंधित मुद्यांसह अनेक मागण्यांवर दबाव आणण्यासाठी गुर्जर आरक्षण संघर्ष समितीने रविवारी महापंचायत आयोजित केली होती. महापंचायत दरम्यान संघर्ष समितीचे अध्यक्ष विजय बैंसला यांनी या मागण्यांबाबत राज्य सरकारकडून समुदायासमोर मसुदा उत्तर वाचून दाखवले. समुदायाच्या मान्यतेने महापंचायत मागे घेण्यात आली आहे. तथापि, आंदोलकांनी रेल्वेरोको केल्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. गुर्जर समुदायाच्या सदस्यांनी 54794 क्रमांकाची प्रवासी रेल्वे थांबवल्यामुळे इतर गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम झाला. साहजिकच दिल्ली-मुंबई मार्ग काही काळासाठी बंद करण्यात आला. यापूर्वी, समुदायाने सरकारला प्रतिसाद देण्यासाठी रविवारी दुपारपर्यंतचा वेळ दिला होता.

आंदोलन टाळण्याचे सरकारचे आवाहन

गृह राज्यमंत्री जवाहर सिंह बेधम यांनी गुर्जर नेत्यांना आंदोलन टाळण्याचे आवाहन केले आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले विचार व्यक्त करण्याचा अधिकार आहे. परंतु, जेव्हा सरकार कोणत्याही महापंचायत आणि आंदोलनाशिवाय चर्चा करण्यास तयार असते, तेव्हा महापंचायत का घ्यावी? असा प्रश्न गृह राज्यमंत्र्यांनी उपस्थित केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.