तिसे ग्रामस्थ दरडीच्या छायेखाली
वर्ष उलटूनही संरक्षण भिंतीच्या कामाला मुहूर्त मिळेना
रोहा, ता. ९ (बातमीदार) ः गतवर्षी पडलेल्या मुसळधार पावसात रोहा तालुक्यातील तिसे गावात दरड कोसळण्याची घटना घडली होती. या घटनेनंतर शासकीय यंत्रणा कामाला लागली होती. जिल्हाधिकारी किशन जावळे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी घटनास्थळी भेट देत नियोजित ठिकाणी पावसाळ्यानंतर तातडीने संरक्षण भिंतीचे काम सुरू केले जाईल, असे आश्वासन दिले होते, मात्र या घटनेला वर्ष लोटले तरीही संरक्षण भिंतीच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे आजही डोंगर पायथ्याशी असलेले तिसे ग्रामस्थ भीतीच्या सावटीखाली जगत आहेत. तर दुसरीकडे संरक्षण भिंतीच्या कामाला वित्तीय व प्रशासकीय मान्यता मिळावी म्हणून आठ दिवसांपूर्वी प्रस्ताव जिल्ह्याधिकारी कार्यालयात पाठविण्यात आले आहे. त्यामुळे उशिरा का होईना स्थानिक प्रशासनाला जाग आली, असे बोलले जात आहे.
रोहे तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या तिसे गावात गेल्या वर्षी पडलेल्या अति मुसळधार पावसात दरड कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेत अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या घटनेनंतर डेंजर झोन क्षेत्रात राहणाऱ्या अनेक राहिवाशांना तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. या घटनेची माहिती समजताच माजी आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी किशन जावळे, प्रांत अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, तहसीलदार किशोर देशमुख, बांधकाम विभागाचे उपअभियंता विजय बागुल यांच्यासह स्थानिक मंडळ अधिकारी व तलाठी व अन्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा लवाजमासह घटनास्थळी दाखल झाले होते. या वेळी ग्रामस्थांना भयमुक्त वातावरणात जगण्याचा सल्ला देत नियोजित ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी किशन जावळे व माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी दिले होते. या कामाच्या प्रस्तावाला तातडीने प्रशासकीय मान्यता दिली जाईल व पुढील वर्षाच्या पावसाळ्यापूर्वी हा प्रश्न मार्गी लागेल, असेदेखील जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आश्वासन दिले होते. या घटनेना जवळपास वर्ष होत आले. त्यातच आता पावसानेदेखील मुक्काम ठोकला आहे. असे असताना अद्याप या ठिकाणी काम सुरू झालेले नाही. मुळात या कामाला वित्तीय आणि प्रशासकीय मान्यता मिळावी म्हणून हा प्रस्ताव आठ दिवसांपूर्वी अर्थातच तब्बल पावसाच्या तोंडावर मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासन हवेत विरले अशीच काहीशी परिस्थिती दिसून येत आहे.
.......................
तिसे गावात वारंवार दरडी कोसळण्याच्या घटना घडत असतात. सतत पाऊस पडत राहिल्याने डोंगरमाथ्यावरून सतत दगड, माती, डोंगरावरील मुळे सोडलेली झाडे घरावर केव्हाही पडून अपघात घडतात. या अनुषंगाने तिसे गावातील एकूण २५० घरांपैकी ११३ घरे बाधित आणि डेंजर झोनखाली आहेत. त्याचप्रमाणे २० कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे. माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या तत्परतेमुळे काही प्रमाणात तिथे मदत करण्यात आली होती, मात्र संरक्षण भिंतीच्या कामाला अद्याप सुरुवात न झाल्यामुळे आजही येथील ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली राहत आहेत.
...........................
तिसे गावातील दरडग्रस्त भागात जवळपास ५०० लांबीची संरक्षण भिंत बांधण्यात येणार आहे. या कामासाठी १९ कोटी रुपये किमतीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. या कामासंदर्भात संबंधित चार कार्यालयातील अहवाल प्राप्त झाल्यानंतर कामाला वित्तीय व प्रशासकीय मान्यता मिळावी म्हूणन मागील आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर कामाला सुरुवात करण्यात येईल.
-विजय बागुल, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, रोहा