मुंबई : मुंब्रा-दिवा अपघातात ४ निष्पाप प्रवाशांना जीव गमवावा लागला. या अपघाताने लोकल ट्रेनच्या गर्दीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंब्राजवळील अपघातानंतर रेल्वे प्रशासन खडबडून जागं झालं. या घटनेनंतर रेल्वे मंत्री आणि अधिकाऱ्यांची तातडीची बैठक झाली. या बैठकीत प्रवाशांच्या सोयीसाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत लोकलमध्ये बदल करण्यासाठी महत्वाचे पावले उचल्यात आली आहेत.
मुंब्रा अपघातानंतर रेल्वे मंत्री, रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांची इंटिग्रल कोच फॅक्टरी टीमसोबत बैठक झाली. या बैठकीत मुंबईत चालवण्यात येणाऱ्या नॉन एसी लोकल ट्रेनमध्ये 'ऑटोमॅटिक डोर क्लोजिंग' या मुद्द्यांवर चर्चा झाली. नॉन-एसी ट्रेनमध्ये स्वयंचलित दरवाजा बसवल्यानंतर प्रवाशांना हवेची समस्या आणि श्वास गुदमरण्याचा त्रास होऊ शकतो. तसेच कोचमध्ये हवा खेळती राहिली पाहिजे, याविषयी चर्चा झाली.
नॉन-एसी कोचच्या डब्यात बदल केला जाणार आहे. व्हेंटिलेशनच्या समस्येवरही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नव्या लोकल ट्रेनमध्ये तीन महत्वाचे बदल करण्यात आले आहेत.
दरवाज्यांमध्ये लूव्हर्स (हवादार पट्ट्या) बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे दरवाजे बंद असतानाही हवा खेळती राहील. यासहित कोचच्या छतावर व्हेंटिलेशन युनिट्स बसवण्यात येणार आहेत. यामुळे प्रवाशांना ताजी हवा मिळेल. त्याचबरोबर कोचमध्ये व्हेस्टिब्यूल्स असतील. यामुळे प्रवाशांना एक कोचमधून दुसऱ्या कोचमध्ये सहज जाता येईल. तसेच गर्दीचा समतोल राखला जाईल.
दरम्यान, नव्या लोकल ट्रेनच्या आश्यक चाचण्यानंतर लोकांच्या सेवेत आणली जाणार आहे. नॉन एसी लोकल ट्रेनचा उपक्रम हा मुंबई उपनगरीय नेटवर्कसाठी तयार केल्या जाणाऱ्या 238 एसी लोकल ट्रेनांच्या अतिरिक्त असणार आहे.