राष्ट्रवादीचा वर्धापन दिन, जयंत पाटील म्हणाले, मला पदमुक्त करा; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Marathi June 11, 2025 02:25 AM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 26 वा वर्धापन दिन पुण्यात (Pune) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे ज्या शरद पवारांनी या पक्षाची स्थापन केली त्यांनी आणि अजित पवारांनी देखील पुण्यातच वर्धापन साजरा केल्याने पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे एकाच दिवशी दोन वर्धापन दिन साजरे झाले. मात्र, यंदाचा वर्धापन सोहळा गाजला तो प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाषणाने. ‘मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली, 7 वर्षांचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे, मला पदमुक्त करा’ अशी विनंतीच जयंत पाटील यांनी केली. जयंत पाटील (Jayant patil) यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली आहे. आता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

‘मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली, 7 वर्षांचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. तुम्हा सर्वांदेखत साहेबांना विनंती करेन, मला प्रदेशाध्यक्ष पदावरुन मुक्त करावे. शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे, पवार साहेबांनी यावर योग्य निर्णय घ्यावा, आपल्याला बरेच पुढे जायचे आहे, असे म्हणत जयंत पाटील यांनी आपल्याला प्रदेशाध्यक्ष पदावरुन मुक्त करण्याची विनंती आज वर्धापन दिनाच्या सोहळ्यात केली. जयंत पाटील यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यावर, अजित पवारांनी दोन वाक्यात विषय संपवला.

”जयंत पाटील काय बोलले हे मला माहित नाही. मात्र, त्यांना काय बोलायचं हे त्यांच्या संघटनेचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामध्ये मी पडण्याची गरज नाही,” अशा शब्दात अजित पवार यांनी जयंत पाटलांच्या वक्तव्यावर भाष्य केलं. या प्रश्नावर अजित पवारांनी अधिक बोलणे टाळले.

कार्यकर्त्यांची निवडणूक

दरम्यान, अजित पवार यांनी देखील पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यातून कार्यकर्त्यांना ऊर्जा दिली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे व तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समर्थकांना वेगवेगळी पद द्यायची असतात. लोकसभा आणि विधानसभेवेळी कार्यकर्ते स्वतःला झोकून देतात. मग, या कार्यकर्त्यांना ही संधी द्यावी लागते, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांना न्याय द्यावा लागतो. आता या निवडणुका ऑक्टोबरपर्यंत येतील. राज्य निवडणूक आयोग त्या कामाला लागलेली आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.

लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी आहे

लाडक्या बहिणींचे पैसे थकलेले नव्हते. विरोधक जाणीवपूर्वक गरज सरो, वैद्य मरो अशी अफवा पसरवत होते. आम्ही गेल्या सरकारसारखे नाही. याउलट आम्ही जाहीर केलेली योजना योग्यरीत्या राबवत आहोत. लाडक्या बहिणी, शेतकरी यांच्यासाठी मदतीचं धोरण कायम असेल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

पाटील समर्थकांकडून सभागृहात घोषणाबाजी

दरम्यान, सभागृहात जयंत पाटील यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्या समर्थकांनी सभागृहात घोषणाबाजी केली. तेव्हा जयंत पाटील यांनी आपल्या समर्थकांना शांत बसण्याचे आवाहन केले. शेवटी पक्ष हा पवार साहेबांचा आहे. पवार साहेबांनी योग्य तो निर्णय घ्यावा. आता आपल्याला बरंच पुढे जायचं आहे. त्यामुळे आतापर्यंत दिलेल्या संधीसाठी मी पवार साहेबांचे आभार मानतो, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

हेही वाचा

आधी लोकसभा उमेदवाराने साथ सोडली, आता विधानसभा उमेदवाराचा जय महाराष्ट्र; ठाकरेंच्या शिवसेनेला ‘दे धक्का’

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.