अलिबाग, ता. १० (वार्ताहर) : जन्मोजन्मी हाच पती मिळावा, असे साकडे घालत व पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत मंगळवारी (ता. १०) जिल्ह्यात सर्वत्र वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. अनेक महिलांनी वटवृक्षाची पूजा करून, वडाला दोरा गुंडाळून मनोभावे पूजा केली. प्रत्येक गावात, शहरातील महिलांनी पारंपरिक साड्या, नथ, हिरवा चुडा, गजरा परिधान करत सण उत्साहात साजरा केला.
वटपौर्णिमा सण भारतीय संस्कृतीत खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करतात, कारण वटवृक्ष हे शांती, समृद्धी आणि दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे, यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. या व्रतासाठी विविध प्रकारची फळे, फुले, बांगड्या, फणसाचे गरे, काळ्या मण्यांचे सर, धागा, करडा इत्यादी वस्तू वापरून महिलांनी वाण सजवले. सजवलेल्या वाणाने वडाची पूजा करण्यात आली. पूजेचे वाण सुवासिनी एकमेकींना सौभाग्याचे लेणे म्हणून देतात. अलिबाग शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ऐतिहासिक वडाची पूजा करण्यासाठी नववधूंसह इतर सुवासिनींनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. त्याचप्रमाणे वरसोली येथील रामनाथ, विठ्ठल मंदिर आवारातील वडाच्या झाडाचीही अनेक महिलांनी उत्साहाने पूजा केली. पूजा झाल्यानंतर सर्व सुवासिनींनी एकमेकींना वाण दिले व वटपौर्णिमेच्या शुभेच्छा होत्या. दुपारी ११.३० वाजल्यानंतर मुहूर्त असल्याने अनेकांनी दुपारच्या वेळेत पूजेसाठी हजेरी लावली होती. अनेक नोकरदार महिलांनी आपले ऑफिस सांभाळून सायंकाळी पूजा केली.
-------------------
खड्डे बुजविण्यासाठी सत्यवानांचे साकडे
वटपौर्णिमेचे औचित्य साधून अलिबाग परिसरातील सत्यवानांनी रेवदंडा बायपास येथे रस्त्याला पडलेले खड्डे बुजवण्यासाठी साकडे घातले. अलिबाग शहराच्या चेंढरे ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या अलिबाग-वडखळ रस्त्यावर अनेक वर्षे खड्ड्यांचे साम्राज्य आहे. हे खड्डे बुजविण्याचा अनेकदा प्रयत्न झाला आहे. लोकप्रतिनिधींनी खड्डे बुजविण्याची मागणीदेखील केली आहे; परंतु या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या रस्त्यावर सुमारे तीन फुटांचे खड्डे पडले आहेत. या ठिकाणी कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता आहे. यासाठी स्थानिक तरुणांनीच वटपौर्णिमेच्या दिवशी रस्त्यात पडलेल्या खड्ड्यात वडाचे झाड लावून विधिवत पूजा करून वडाला फेऱ्या मारल्या. तरुणांनी केलेला हा प्रकार पाहून वाहनचालकांनी आणि नागरिकांनी त्यांना साथ दिली.