पुणे : बालेवाडी क्रीडा संकुलात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा आज (10 जून) 26 वा वर्धापन दिन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. तसेच भाजपासोबत जाण्याचा निर्णय का घेतला? याबाबतही माहिती दिली. (Ajit Pawar stated that he always had to participate in power as he never got a majority)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेची माहिती देताना अजित पवार म्हणाले की, मला आजही 10 जून 1999 हा दिवस आठवतो. त्यावेळी शरद पवार आणि इतर काही मान्यवरांनी एकत्र येत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. तेव्हापासून आजपर्यंत पक्षाने कधीही मागे वळून पाहिले नाही. आपल्या पक्षाला कधीही बहुमत मिळाले नाही, त्यामुळे आपल्याला नेहमीच सत्तेत सहभागी व्हावे लागले. कारण आधीपासूनच राजकारणाची अशी परिस्थिती निर्माण झाली की एका पक्षाची सत्ता येण्याचे दिवस संपले आहेत. केंद्रात देखील कोणाला यूपीए किंवा एनडीए अशी आघाडी आणि युती करावी लागल्याची परिस्थिती देशाने पाहिली आहे. पण सर्वांनी साथ दिल्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 26 वा वर्धापन दिन साजरा करत आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.
हेही वाचा – Politics : सगळ्यांचा बाप म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री…; राणेंच्या वक्तव्याची शिंदेंच्या मंत्र्यांकडून तक्रार?
भाजपा आणि एनडीएसोबत जाण्याच्या निर्णयावर स्पष्टीकरण देताना अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिव, शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या विचाराने चालणारा पक्ष आहे. पण आता काही जण मला विचारतात की, तुम्ही भाजपाबरोबर का गेला आहात? मी तुम्हाला सांगतो की, 2019 साली आपल्या पक्षाने शिवसेना पक्षाबरोबर सरकार स्थापन केले होते. तेव्हा देखील आपण सत्तेसाठी काही तडजोडी केल्या होत्या. कारण शेवटी विरोधी पक्षात बसून आणि घोषणा देऊन चालत नाही. खरं तर आपण साधू संत नाही. आपण लोकांचे प्रश्न सोडवणारे आणि बेरजेचं राजकारण करणारे लोक आहोत. त्यामुळे आपण भाजपा आणि एनडीएबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – Devendra Fadnavis : व्हेंटिलेशनची व्यवस्था करावी लागेल हे सरकारला माहितीय; फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला