अमरावती - ‘ही आरपारची लढाई आहे. सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या समस्या कळत नाहीत, हे शल्य आहे. कर्जमाफीसाठी पुकारलेला एल्गार माझ्या जीव जाण्याने पूर्ण होत असेल तर मी त्यासाठीही तयार आहे. सध्या महात्मा गांधींच्या मार्गाने बेमुदत उपोषण सुरू आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांचा व उपोषणकर्त्यांचा अंत बघू नये. आम्हाला भगतसिंगदेखील होता येते,’ असा इशारा माजी आमदार बच्चू कडू यांनी दिला.
गेल्या चार दिवसांपासून कडू यांचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भूमी गुरुकुंज मोझरी येथे बेमुदत उपोषण सुरू आहे. बुधवारी, चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावल्याचे दिसून आले. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी मंगळवारी भेट देत त्यांना औषधोपचार घेण्याची विनंती केली.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंशी भ्रमणध्वनीवरून चर्चाही घडवून आणली. त्यांनी औषधोपचार घेतले असले तरी अन्य बाबी स्वीकारण्यास नकार दिला. ते म्हणाले, ‘निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी कर्जमाफीचा शब्द दिला होता. तो पाळणे अपेक्षित होते. मात्र दिलेला शब्द त्यांनी फिरवल्याने हा मार्ग अवलंबावा लागला. हा नाइलाज आहे.
शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत असताना व आत्महत्या होत असतानाही सरकारला त्याची जाणीव होऊ नये, हे वेदनादायी आहे. आता पुकारलेल्या लढाईतून माघार नाही. ठोस निर्णय घेऊनच या युद्धाचा शेवट होईल व त्यासाठी जिवाची बाजी लावावी लागली तरी बेहत्तर.’
कडू यांच्या समर्थनार्थ त्यांच्या ‘प्रहार’ संघटनेचे कार्यकर्तेही उपोषणास बसले आहेत. यामध्ये दिव्यांगांचाही समावेश आहे. यातील अनेकांची प्रकृती खालावू लागली आहे.
वाढते जनसमर्थन
शेतकऱ्यांना कर्जमाफी व सातबारा कोरा करा, या मुख्य मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष, माजी आमदार बच्चू कडू यांनी पुकारलेल्या अन्नत्याग आंदोलनास समर्थन वाढू लागले आहे. राजेश टिकैतनंतर राज्यभरातून समर्थनाचे पत्र येऊ लागले आहेत. महादेव जानकर, रविकांत तुपकर, प्रा. वसंत पुरके, मनोज जरांगे यांनी प्रत्यक्ष भेट घेत समर्थन जाहीर केले.