गेवराई : तालुक्यात विवाहित महिलेने विहिरीत उडी मारून वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली असून, तिला मारहाण करून विहिरीत फेकल्याचा आरोप विवाहितेच्या नातेवाइकांनी केला आहे. सर्वांवर गुन्हा नोंदविण्याची मागणी करत मंगळवारी सकाळी एसपी कार्यालयात नातेवाइकांनी आक्रोश केल्यानंतर सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
एरंडगाव (ता. गेवराई) वर्षा ओम लाखे (वय २८) या महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. या घटनेची माहिती ईटकुर (ता. गेवराई) तिच्या माहेरकडील नातेवाइकांना मिळताच त्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. जोपर्यंत पोलिस येत नाहीत तोपर्यंत मृतदेह बाहेर काढला जाणार नाही, असा पवित्रा नातेवाइकांनी घेतला होता.
या घटनेची माहिती गेवराई पोलिसांना मिळताच ते एरंडगावातील घटनास्थळावर दाखल झाले. पोलिसांच्या उपस्थितीत मृत वर्षाचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आल्यानंतर बीडच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यास पाठविण्यात आला. दरम्यान, मंगळवारी (ता. दहा) वर्षाच्या मृतदेहाची तिच्या माहेरच्या लोकांनी पाहणी केली.
तिच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळून आल्याचा आरोप करत तिला सासरच्या लोकांनी विहिरीत फेकले असून सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाइकांनी घेतला. एसपी कार्यालयात नातेवाइकांनी ठिय्या मांडला. अखेर मंगळवारी सायंकाळी मृत वर्षा लाखे हिच्या पतीसह सासू, सासरे अशा पाच जणांविरोधात गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
विहिरीजवळ आढळली चप्पलवर्षा आणि आपण शेतात काम करत होतो. पोट दुखत असल्याने शौचास जाऊन येते असे म्हणून गेलेली वर्षा बराच वेळ होऊन परत आली नाही. म्हणून आपण हाका मारल्या. परंतु प्रतिसाद मिळत नसल्याने शोध घेतला असता तिची चप्पल विहिरीच्या जवळ आढळून आल्याचे वर्षाच्या सासूकडून सांगण्यात आले.