हिंजवडी : आयटी पार्क हिंजवडी-माण परिसर पंचतारांकित असला तरी येथील वाहतूक समस्या कायम आहेत. हिंजवडी- माण रस्त्यावर मंगळवारी (ता. १०) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सुमारे तीन तास कोंडी झाली. वाहनांच्या पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या. त्यामुळे पाऊस थांबला, पाणी ओसरले. मग वाहतुकीचे घोडे अडले कुठे? असा उद्विग्न सवाल आयटीयन्स करत आहेत.
हिंजवडी परिसरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. विशेषतः कार्यालयीन वेळेत म्हणजे सकाळी ८.३० ते ११ व संध्याकाळी ५ ते ८ दरम्यान रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागतात. काही मुख्य मार्गावरील वाहतूक वारंवार ठप्प होते. तरीही प्रशासन फक्त बघ्याची भूमिकेत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. रस्त्यांची अवस्था पाहिली तर विश्वास बसत नाही की आपण आयटी राजधानीत राहात आहोत का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
रोज दोन ते तीन तास फक्त कोंडीत वेळ जातो. घर आणि कार्यालय या दोन ठिकाणच्या प्रवासावरच खूप वेळ वाया जातो. त्यामुळे कामात लक्ष केंद्रित करणे अवघड झाले आहे. केवळ मनःस्तापच सहन करावा लागत आहे.
- अक्षय इखार, आयटी अभियंता
आयटी पार्क वसले, तोपर्यंतही सर्व काही ठीक होते. मात्र, कुठल्याही ठोस पायाभूत सुविधा पुरविण्याआधी शेकडो मोठ्या टाऊनशिपला परवानगी देण्यात आल्या. त्यामुळे लोकसंख्येचा मोठा उद्रेक झाला आहे. सर्व सुविधा केल्यानंतर परवानगी दिली असती; तर हा ताण आलाच नसता.
- आनंद चौगुले, आयटी अभियं ता
प्रमुख कारणेअरुंद रस्ते, पावसामुळे साचणारे पाणी, रस्त्यातील खड्डे, मेट्रोची सुरू असलेली कामे, रस्त्यांवरील अतिक्रमणे, गर्दीच्या वेळी अवजड वाहनांची घुसखोरी, उलट दिशेने येणारी बेशिस्त वाहने, बेकायदा पार्किंग, बंद पडणारी वाहने, वाहतूक नियंत्रण व्यवस्थेचा पूर्ण अभाव.
कोंडीची मुख्य ठिकाणेफेज १ ते माण, विप्रो सर्कल ते ॲमस्टर डॅम चौक, वाकड पूल ते शिवाजी चौक, भूमकर चौक, वाकड सेवारस्ता, लक्ष्मी चौक, हिंजवडी पांडवनगर ते माण चौक.
नागरिकांच्या मागण्यारस्त्यांची तातडीने डागडुजी करणे, मेट्रोच्या कामाच्या काळात पर्यायी रस्ते हवेत, स्मार्ट सिग्नल यंत्रणा, वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावीपणे करणे ऑफिस पिक अवर्ससाठी विशेष वाहतूक व्यवस्थापन नियोजन, पिक अवर्सला जड वाहतूक बंद करणे.