जालना : शेतात काम करीत असताना विजेच्या धक्क्याने वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना वरूड (ता. जालना) शिवारात मंगळवारी (ता. दहा) दुपारी घडली.
विनोद तुकाराम म्हस्के (वय ३०) हे शेतात मल्चिंग पेपर अंथरत होते. त्यावेळी शेतातील केबल तुटल्याने विनोद म्हस्के यांना विजेचा धक्का बसला. त्यामुळे ते कोसळले. वडील का पडले, हे पाहण्यास श्रद्धा (१२) आणि समर्थ (१०) हे सरसारवले. त्यावेळी त्यांनाही विजेचा धक्का बसला. या दुर्दैवी घटनेत या तिघांचाही जागीच मृत्यू झाला.
ही घटना पाहिल्यानंतर विनोद मस्के यांच्या पत्नीने आरडाओरड केली. ती ऐकून परिसरातील शेतकऱ्यांनी धाव घेतली. वीज प्रवाह खंडित करून विनोद, श्रद्धा आणि समर्थ या बाप-लेकरांना जालन्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून तिघांना मृत घोषित केले.
उत्तरीय तपासणीसाठी तिन्ही मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णाण्यात दाखल करण्यात आले. वटपौर्णिमेच्या दिवशी घडलेल्या या घटनेने गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
वडिलांना पाणी देण्याचा प्रयत्नविजेचा जबर धक्का लागल्यानंतर विनोद म्हस्के हे जमिनीवर कोसळले. त्यांना सावरण्यासाठी, पाणी देण्यासाठी मुलगी श्रद्धा आणि मुलगा समर्थ सरसावला. मात्र, विजेचा धक्का लागून या दोन मुलांचा मृत्यू झाला.