पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा 26 वा वर्धापन दिन सोहळा आज पुण्यात पार पडला. बालगंधर्व रंगमंदिर येथील वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी शरद पवारांकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करण्याची मागणी केली. जयंत पाटील यांच्या या मागणीवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. (Ajit Pawar’s reaction after Jayant Patil demanded Sharad Pawar to relieve him from the post of state president)
जयंत पाटील यांनी पुण्यातील बालगंधर्व येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये भाषण करताना म्हटले की, शरद पवारांनी मला 7 वर्षे प्रदेशाध्यक्षपदाची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पण मला आता या पदातून मुक्त करा आणि नव्या चेहऱ्यांना संधी द्या. शेवटी पक्ष शरद पवार यांचा आहे. त्यामुळे शरद पवार यांनी यावर योग्य निर्णय घ्यावा. कारण आपल्याला बरेच पुढे जायचे आहे, त्यामुळे शरद पवार यांनी आपल्याला प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करावे, अशी विनंती त्यांनी केली. जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा – NCP : भुजबळांसह भरणे आणि वळसे पाटलांची वर्धापन दिनाला दांडी; अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण
बालेवाडी क्रीडा संकुलात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन सोहळा पार पडल्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर अजित पवार म्हणाले की, जयंत पाटील काय बोलले हे मला माहित नाही. मात्र, त्यांना काय बोलायचं हे त्यांच्या संघटनेचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे मी त्यामध्ये पडण्याची गरज नाही, असे म्हणत अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर जास्त बोलणं टाळलं.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे गेल्या काही काळापासून चर्चेत राहिले आहेत. मध्यतंतरी जयंत पाटील पक्षात नाराज असून ते भाजपामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा रंगली होती. पण, त्या सर्व चर्चा खोट्या असल्याचे त्यांनी स्वतः पुढे येऊन सांगितले होते. मात्र जयंत पाटील यांच्या पक्षातील भूमिकेवरून युवा आमदार आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे समोर आले होते. जयंत पाटील यांनी पक्षात संघटनात्मक फेरबदल करताना अनेक महत्त्वाची पदे आपल्या विश्वासू आणि निकटवर्तीय कार्यकर्त्यांना दिली आहेत. त्यामुळे पक्षातील इतर अनुभवी, कार्यक्षम आणि निष्ठावान लोकांना संधी मिळत नसल्याचे मत नाराज आमदारांनी केल्याची चर्चा होती. त्यानंतर आता स्वतः जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याचे संकेत दिले आहेत.
हेही वाचा – Devendra Fadnavis : व्हेंटिलेशनची व्यवस्था करावी लागेल हे सरकारला माहितीय; फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला