आधार सत्यापनानंतरच 'त्वरित' बुकिंग
Marathi June 12, 2025 01:25 PM

रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय, 1 जुलैपासून अंमलबजावणी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

‘तत्काल’ रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी आधार पडताळणी अनिवार्य करण्यात येणार आहे. हा महत्वपूर्ण निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असून तो 1 जुलैपासून लागू करण्यात येणार आहे. ही माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या ‘एक्स’ अकाऊंटवर बुधवारी प्रसिद्ध केली असून रेल्वे विभागानेही दिली आहे. त्यामुळे तत्काल बुकिंग करताना आता ओटीपी द्यावा लागणार आहे.

4 जूनलाच या निर्णयाची घोषणा करण्यात आली होती. ई-आधार प्रमाणीकरणानंतरच तत्काल तिकीट बुक करणे शक्य होणार आहे, असे त्यावेळी घोषित करण्यात आले होते. या निर्णयाला अंतिम रुप 11 जूनला देण्यात आले असून रेल्वेने प्रवास करु इच्छिणाऱ्या सर्वांनी याची नोंद घेण्याची सूचना केली गेली.

प्रवाशांच्या सोयीसाठीच

हा नवा नियम प्रवाशांच्या सोयीसाठीच करण्यात आला आहे. रेल्वेच्या प्रवाशांना आपले तिकीट कन्फर्म झाले आहे की नाही, हे या सुविधेमुळे लवकर समजणार आहे. आयआरसीटीसीने दिलेल्या माहितीनुसार भारतात केवळ 10 टक्के रेल्वे उपयोगकर्ते ई आधार प्रमाणित आहेत. रेल्वे प्रवाशांची एकंदर संख्या जवळपास 14 कोटी आहे. तथापि त्यांच्यापैकी केवळ 10 टक्के लोक आधार प्रमाणित आहेत. तत्काल बुकिंग सेवा अधिक सक्षम करण्यासाठी हा नियम करण्यात आल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे 1 जुलैपासून तिकिटाचे ओटीपी प्रमाणीकरण (ऑथेंटिफिकेशन) अनिवार्य करण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली.

नियमाचे कारण काय…

अनेक दिवसांपासून रेल्वेच्या तत्काल बुकिंग सुविधेसंदर्भात तक्रारी येत आहेत. अशा बुकिंमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे होत आहेत. त्यामुळे रेल्वेच्या खऱ्या प्रवाशांना त्रास होत आहे. बनावट ओळखपत्रे असणारे लोकही या सुविधेचा लाभ घेत असल्याचे दिसून आले आहे. रेल्वे तिकिटांचा अशाप्रकारे काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी अनेक प्रवाशांनी केल्यानंतर सरकारने तत्काल बुकिंग व्यवस्था अधिक कठोर करण्यासाठी पावले उचलण्यास प्रारंभ केला. आधार प्रमाणीकरणाच्या नियम केल्याने याचा रेल्वेच्या प्रामाणिक प्रवाशांना लाभ होणार आहे. तसेच तत्काल पद्धतीतील घोटाळेही थांबणार आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.