मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची युती होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. महापालिका निवडणुकीसाठी हे दोन्ही नेते एकत्र येणार असल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे मनसे आणि उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून दोन्ही नेत्यांचे फोटो असलेले बॅनरही लावले जात आहेत. दोन्ही नेत्यांची युती झाल्यातच जमा असल्याचं चित्र रंगवलं जात असतानाच या सर्व गोष्टींना राज ठाकरे यांनी धक्का दिला आहे. राज यांनी आज थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. विशेष म्हणजे ही भेट मंत्रालय किंवा वर्षा बंगल्यावर झाली नाही. तर मुंबईतील एका बड्या हॉटेलात ही भेट झाली आहे. त्यामुळे मनसे महायुतीत येण्याच्या किंवा मनसे महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीतून पाच महत्त्वाच्या गोष्टी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचाच घेतलेला हा आढावा.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात हॉटेल ताज लँडस एन्डमध्ये भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. एक म्हणजे ही बैठक मंत्रालयात न होता एका हॉटेलात झाल्याने उलटसुलट चर्चांना अधिकच बळ मिळालं आहे. या भेटीवेळी फडणवीस आणि राज ठाकरे यांच्याशिवाय तिसरी व्यक्ती उपस्थित नव्हती. त्यामुळेही राजकीय चर्चांनी जोर धरला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच हॉटेलात राज आणि फडणवीस यांची लोकसभा निवडणुकीवेळी भेट झाली होती. योगायोग म्हणजे लोकसभा निवडणुकीवेळी राज आणि फडणवीस ताज लँडस एन्डमधील रुम नंबर 2101 या रुममध्येच भेटले होते. या रुममध्ये झालेल्या बैठकीनंतर राज ठाकरे महायुतीत आले होते. त्यांनी महायुतीचा प्रचारही केला होता. आजही या दोन्ही नेत्यांची याच हॉटेलातील रुम नंबर 2101 रुममध्ये भेट झालीय. त्यामुळे राज पुन्हा महायुतीत येऊन महापालिका निवडणूक लढणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होत्या. खासदार संजय राऊत तर रोज यावर भाष्य करून युतीची वातावरण निर्मिती करत होते. त्यामुळे ही युती होणार असल्याची चर्चा होती. आदित्य ठाकरे यांचा 13 जून रोजी वाढदिवस आहे. आणि राज ठाकरे यांचा 14 जून रोजी वाढदिवस आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून राज्यात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर राज ठाकरे यांचाही फोटो लावला आहे. त्यामुळे युती होणारच अशी चर्चा सुरू असताना फडणवीस यांनी राज यांची भेट घेऊन या चर्चांना ब्रेक दिला आहे. फडणवीस यांचा हा ऐनवेळचा मास्टर स्ट्रोक असल्याचं सांगितलं जात आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी राज ठाकरे महायुतीत आले होते. पण विधानसभेला राज ठाकरे हे स्वबळावर लढले होते. त्यानंतर पुन्हा एकदा राज यांना सोबत घेण्याचे महायुतीचे प्रयत्न आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होण्याची शक्यता बळावली आहे. ही युती रोखण्यासाठीच राज यांना महायुतीत घेण्याचा प्रयत्न फडणवीस करत असल्याचं सांगितलं जातंय. त्यासाठीही ही भेट अत्यंत महत्त्वाची असल्याचं मानलं जातंय.
राज ठाकरे महायुतीत येऊन महापालिका निवडणूक लढण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास राज्यातील सत्तेत राज ठाकरे वाटा मागण्याची शक्यता आहे. मनसेला सत्तेत मंत्रीपद आणि आमदारकी देण्यावरही महायुतीत चर्चा होऊ शकते. या शिवाय मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे या चार महत्त्वाच्या महापालिकेतील सत्तेचं सूत्रही ठरल्यावरच राज ठाकरे महायुतीत येऊ शकतात असं सांगितलं जातं.
महापालिका निवडणुकीत राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यावर एक दोन नव्हे तर चार पाच महापालिकेत महायुतीला मोठा फटका बसू शकतो. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, कल्याण-डोंबिवली महापालिकेत राज ठाकरेंच्या मनसेमुळे होणारं नुकसान टाळण्याचा प्रयत्नही या निमित्ताने फडणवीस यांच्याकडून करण्यात आल्याचं सांगितलं जातंय.
महापालिका निवडणुकीसाठी फडणवीस आणि राज यांची आज झालेली चर्चा महत्त्वाची असल्याचं सांगितलं जात आहे. विधानसभा निवडणुकीत मनसे आणि महायुतीत मतभेद झाले होते. त्यामुळे राज ठाकरे स्वबळावर लढले होते. माहीममध्ये राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे उभे होते. पण या ठिकाणी महायुतीने उमेदवार दिला होता. त्यामुळे राज आणि महायुतीत दुरावा निर्माण झाला होता. हा दुरावा दूर करण्याचाही आजच्या बैठकीतून प्रयत्न झाल्याचं सांगितलं जातंय.