छत्रपती संभाजीनगर : वैजापूर तालुक्यातील जमनवाडी शिवारात 8 जून रोजी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता. अशातच बुधवारी (11 जून) छत्रपती संभाजीनगर शहरात संध्याकाळी सिद्धार्थ उद्यानाच्या गेटवरील डोमची भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला. वादळी वारे आणि पावसामुळे सिद्धार्थ उद्यानाचा गेटवरील डोम पडला. वादळी वारा आणि पाऊस यामुळे डोम कोसळला असल्यामुळे महानगर पालिकेच्या कामावरही प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. तर या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले आहेत. याची घटनेची दखल छत्रपती संभाजीनगर शहर महानगरपालिकेने घेतली आहे. मनपाकडून सिद्धार्थ उद्यान दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या महिलांच्या वारसाला 5 लाख रुपये देण्याची घोषणा मनपा आयुक्त श्रीकांत यांनी केली आहे. (Chhatrapati Sambhajinagar siddharth garden entrance wall collapsed 5 lakhs announced by Municiple Corporation)
हेही वाचा : Chhatrapati Sambhajinagar : वादळी वाऱ्यामुळे सिद्धार्थ उद्यानातील भिंत कोसळली, दोन महिलांचा मृत्यू
शहरातील महानगरपालिकेच्या सिद्धार्थ उद्यानामध्ये संध्याकाळी जोराचा वारा आल्याने तेथील गेटवरील भागाची भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे दोन कुटुंबावर शोककाळा पसरली असून त्या कुटुंबाला महानगरपालिकेतर्फे प्रत्येकी पाच लाख रुपये देण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी दिली आहे. ज्या कंत्राटदाराकडे याचे ऑडिट होते, त्याने ते वेळेवर केले नसल्यामुळे ही दुर्घटना घडली. अपूर्ण काम होते यासाठी त्याच्यावरही कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जी श्रीकांत यांनी दिली आहे. राज्याचे पालकमंत्री संजय शिरसाट म्हणाले की, महानगरपालिका सिद्धार्थ उद्यान येथे घडलेली घटना दुःखद आहे. मयताच्या नातेवाईकांना आम्ही मदत करतो आहोत. या घटनेला जबाबदार व्यक्तीला कडक शासन करण्याचे आदेश पोलीस आणि मनपा आयुक्तांना दिले आहेत,” असे त्यांनी सांगितले.
बुधवारी (11 जून) छत्रपती संभाजीनगर शहरात संध्याकाळी अचानक वादळी वाऱ्याला आणि पावसाला सुरुवात झाली. यामुळे सिद्धार्थ उद्यान येथील डोम कोसळला. यामध्ये दोन महिलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. 35 वर्षीय स्वाती खैरनार (रा. रांजणगाव) आणि 38 वर्षीय रेखा गायकवाड (रा. सौभाग्य चौक) यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. त्या दोघीही उद्यानातील कर्मचारी होत्या. छत्रपती संभाजी नगर शहरातील घाटी रुग्णालयामध्ये दोन्ही महिलांना आणण्यात आले आणि या ठिकाणी नातेवाईकांनी एकच गर्दी केलेली आहे. दुर्घटनेनंतर महानगरपालिकेचा एकही अधिकारी, कर्मचारी आला नाही याची खंत देखील नातेवाईकांकडून व्यक्त करण्यात आली होती. या घटनेमध्ये 5 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.