विक्रमगड, ता. १२ (बातमीदार) : पावसाळा सुरू होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी असल्याने विक्रमगड तालुक्यातील खेडो-पाड्यांतील शेतीपूर्व कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. जूनच्या तिसऱ्या आठवड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. शेती हंगाम सुरू होणार असल्याने बाजारहाट (खरेदी) करण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे आठवडा बाजारासाठी बुधवारी (ता. ११) गर्दी झाली होती.
पाऊस सुरू झाल्यावर या भागातील आठवडा बाजार भरत नाही. तसेच पावसाळ्यातील कामे सोडून येथील शेतकऱ्याला बाजारासाठी येणे शक्य होत नाही. पावसाळ्यापूर्वीच मसाला, मिरची, हळद, कांदा, बटाटा, लसूण, कडधान्य, सुकी मच्छी, तर पावसापासून बचावाकरिता छत्री, मुलांना शाळेत जाण्याकरिता रेनकोट, वह्या, पुस्तके, पेन वगैर साहित्य अशा अनेकविध गरजेच्या वस्तू खरेदी करुन पावसाळी हंगामापर्यंत पुरेल, असा साठा शेतकरीवर्ग करून ठेवतो. त्यासाठी विक्रमगडच्या बाजारात बुधवारी विविध वस्तू खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती.
मेमध्ये अवकाळी पावसाने जोरदार बरसल्याने शेतकऱ्यांची माॅन्सूनपूर्व खरेदी रखडली होती. जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने उसंत घेतल्याने ग्रामीण भागात खरेदीसाठी आदिवासी शेतकऱ्यांची झुंबड दिसत होती.