अमरावती : चाकूचा धाक दाखवून दोन लुटारुंनी आपल्याकडे बॅगेत असलेली १५ लाख रुपयांची रोकड लुटून नेल्याची तक्रार दाखल केल्याने पोलिस यंत्रणा खळबळून जागी झाली. अखेर तक्रार बनावट निघाल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
ज्या व्यक्तीने पंधरा लाख लूटल्याची तक्रार नांदगावखंडेश्वर ठाण्यात दिली ती व्यक्ती अमरावती येथील एका बँकेत कार्यरत असून, त्यांच्याकडे जिल्ह्यातील काही शाखांचे काम सोपविण्यात आले आहे. दुपारी चारच्या सुमारास सदर व्यक्तीने नांदगावखंडेश्वर ठाण्यात पोचून त्यांना वाघोळा ते खरपी मार्गावर दोघा अनोळखी दुचाकीस्वाराने अडवून, दुचाकीच्या चाकाची हवा सोडली.
त्यानंतर चाकूचा धाक दाखवून १५ लाख रुपये असलेली बॅग लुटून नेली, अशी तक्रार सदर व्यक्तीने नांदगावखंडेश्वर ठाण्यामध्ये नोंदविली. त्यामुळे संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती वरिष्ठांना दिली. त्यावरून आधी नांदगावखंडेश्वरचे ठाणेदार सदर व्यक्तीने दाखविलेल्या ठिकाणी पोहचले असता, ठाणेदारांना त्याने वेगळेच घटनास्थळ दाखविले.
त्यावेळी स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाला वाघोळा ते खरपी मार्गावरचे घटनास्थळ दाखविले. पोलिसांना सदर व्यक्तीच्या हालचाली व दिलेल्या माहितीवरून संशय आल्यामुळे लूटमारीची तक्रार नोंदविणाऱ्याच व्यक्तीची उलटतपासणी सुरू केली. त्यावेळी त्या व्यक्तीने पैशाची बॅग नदीकाठी झुडपात लपवून ठेवल्याचे सांगितले.