वज्रेश्वरी, ता. १२ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी, गणेशपुरी, अकलोली कुंड तीर्थक्षेत्रात मुक्कामी बस येत नसल्याने ग्रामस्थ, नोकरदार, भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे अर्नाळा, शहापूर आगार व्यवस्थापकांनी एसटी बसच्या फेऱ्या पूर्ववत कराव्यात, अशी मागणी गणेशपुरी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप खिराडे, उपसरपंच श्याम जत्तन यांनी एका निवेदनातून केली आहे.
शहापूर आगारातून गणेशपुरीसाठीची कायमस्वरूपी सेवा चालू होती; मात्र कोविडकाळात ही सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर गणेशपुरीत येणाऱ्या सर्व आगाराच्या बस नियमित सुरू आहेत. फक्त शहापूर ते गणेशपुरी ही बससेवा कोविडनंतर सुरू झालेली नाही. शहापूर परिसराबरोबर आजूबाजूच्या गावात जाण्यासाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त होती. त्याचप्रमाणे शहापूर आगारामार्फत पडघा, किन्हवली, खंबाळा, अंबाडी, वज्रेश्वरी, गणेशपुरी ही बससेवा पण आगार व्यवस्थापकाने सुरू करावी, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.
---------------------------------------
एसटीच्या महसुलात भर
- गणेशपुरी ते विरार ही मुक्कामी बस बंद असल्याने ग्रामस्थ, विद्यार्थी नोकरदारांना सकाळी साडेपाच वाजता सुटणाऱ्या अकलोली कुंड ते वसई या बसचा पर्याय आहे; पण प्रवासी संख्या अधिक असल्याने अनेकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो.
- वाहनमालक प्रवाशांच्या अडचणीचा फायदा घेत मनमानी पद्धतीने आर्थिक लूट करतात. त्यामुळे अकलोली कुंड ते विरार ही बस सुरू करावी. जेणेकरून प्रवाशांची होणारी गैरसोय होणार नाही. तसेच एसटी महामंडळाला महसूल मिळाल्याने त्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडेल.