उल्हासनगर - शंभर दिवसांच्या कृती आराखड्यात कार्यालयाचा कायापालट करून सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या शासनाच्या समितीकडून कौतुकाची पोचपावती मिळवणाऱ्या उल्हासनगर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने आयएसओ प्रमाणपत्राला गवसणी घातली आहे.
प्रमाणपत्र मिळवण्यात सिंहाचा वाटा उचलणारे सहायक संचालक नगररचना ललित खोब्रागडे व त्यांच्या टीमचे महानगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी आज गुरुवारी महासभा सभागृहात जाहीर सत्कार केला आहे.
नगररचना विभागातील कामकाजाला गती मिळण्यासाठी सहायक संचालक नगररचना ललित खोब्रागडे यांनी आधीचा जो डेव्हलपमेंट प्लॅन समजण्यात अडचण येत होती. ती दूर करण्याकरिता विशेष प्रशिक्षणचे आयोजन केले.
त्यामुळे सिटी सर्वेच्या सीट्स व डेव्हलपमेंट प्लॅन यांचा ताळमेळ बसला. प्लॅन नागरिकांना समजावा याकरिता नगररचना विभागाच्या बाहेर स्क्रीन झळकवण्यात आली. बांधकाम परवाना कमी वेळेत मंजूर व्हावा व त्यात पारदर्शकता असावी यासाठी ऑनलाइन बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट प्रणाली सुरू केली.
संपूर्ण रेकॉर्ड हा आयएसओ मानकामध्ये बसावा यासाठी सर्व जुन्या फाईलींचे वर्गीकरण करून रेकॉर्ड रूम अद्यावत केले. त्यानंतर लोकसेवा हक्क कायद्यानुसार सर्व प्रक्रिया समाधानपूर्वक सुरू केल्या. पहिल्यांदा नगररचना विभागासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात आले.
महानगरपालिकेला शंभर दिवसांच्या कृती आराखड्यात प्रथम क्रमांक व आयुक्त मनीषा आव्हाळे यांना सर्वोत्तम आयुक्त म्हणून घोषित करण्यापूर्वी शासनाच्या समितीने उल्हासनगर महानगरपालिकेचा आढावा घेऊन सर्वेक्षण केले होते. त्यावेळी समितीने नगररचना विभागाने जो कायापालट केला त्याचे कौतुक केले होते.
यासंदर्भात सहायक संचालक नगररचना ललित खोब्रागडे यांच्याशी विचारणा केली असता,आयएसओ प्रमाणपत्र मिळणे हे टीमवर्कचे फलित आहे. आम्ही आयुक्त मनीषा आव्हाळे यांचे मार्गदर्शन व सूचनांची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी केली.
यासाठी नगररचनाकार विकास बिरारी, कनिष्ठ अभियंता संजय पवार, अधिकारी पियुष घरत, गणेश देवरे, किरण दुबे, दीपक कजानीया, हेमलता गावित, विद्या अढळ, अनिता हटाळे यांच्यासोबत सर्व कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत काम केले. आणि आयएसओ प्रमाणपत्र मिळाले. आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी जेंव्हा सत्कार केला तेंव्हा सर्व अधिकारी, कर्मचारी सुखावून गेले होते असे ललित खोब्रागडे यांनी सांगितले.