Malegaon Sugar Factory Election : माळेगावच्या निवडणूकीत नाराजी काढण्याचे प्रयत्न सुरू; केशवराव जगताप, बाळासाहेब तावरेंवर जबाबदारी
esakal June 13, 2025 02:45 AM

माळेगाव - 'माळेगावच्या निवडणूकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकृत उमेदवारांचा निळकंठेश्वर पॅनेल जाहीर केला. त्या पॅनेलमध्ये अजितदादा स्वतःहा उमेदवार आहेत. त्यामुळे हा पॅनेल आपण सर्वांनी स्वीकारायचा आणि जिंकून आणायचा. राहिला प्रश्न माझ्या उमेदवारीचा. या पॅनेलमध्ये सर्व उमेदवार माझेच आहेत.

यापुढील प्रचार काळात कोणीही नाराज होयचे नाही. उलट जोमाने प्रचारात सहभागी होयचे. अजित दादांसह सर्व पॅनेल शंभर टक्के निवडून आणायचा निर्धार करायचा आहे,` असे आवाहन माळेगावचे अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप यांनी केले.

माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखाना निवडणूकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनेलमधून उमेदवारी मिळावी, यासाठी साडेतीशेपेक्षा अधिक इच्छुकांनी शर्थिचे प्रयत्न केले होते. परंतु २१ जागांसाठी २१ उमेदवारांनाच पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनेलमध्ये अधिकृत उमेदवारी मिळाली.

त्या प्रक्रियेत विद्यमान अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप यांचेही निळकंठेश्वर पॅनेलमध्ये नाव नसल्याचे आज स्पष्ट झाले. याविषयी पत्रकारांशी अध्यक्ष श्री.जगताप बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निळकंठेश्वर पॅनेलमध्ये इच्छुकांची नाराजी अधिक होती, सर्वजण तेवढ्याच तोलामोलाचे होते, परंतु संबंधितांना मर्यादीत जागांमुळे नाइलाजास्तव थांबावे लागले.

असे सांगून श्री. जगताप म्हणाले, 'उपमुख्यमंत्री अजितदादांच्या ताब्यात अनेक सहकारी संस्था अथवा स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. यापुढील काळात शक्य तितक्या इच्छुकांना त्या संस्थांवर काम संधी देण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यामुळे विरोधकांना आपल्या नाराजीचा फायदा होणार नाही, याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची आहे.

बारामती तालुक्यासह माळेगावचा सर्वांगीण विकास अधिक गतीने पुढे घेऊन जाण्यासाठी निळकंठेश्वर पॅनेल बहुमतांनी निवडून आणणे खूप महत्वाचे आहे.` 'माळेगावची निवडणूक ही विकासाच्या आणि ऊस दर राज्यात प्रथम क्रमांकाचा दिला आदी मुद्यांवर लढविली जाणार आहे. टिका टिप्पणीला विशेष महत्व दिले जाणार नाही.

सभासदांना गेली पाच वर्षात विक्रमी ऊस दर दिला आहे. शिवारातील ऊस वेळेत गाळला असल्याने शेतकऱ्यांना गहू, हरभरा पिके घेता आली. कामगारांचे प्रश्न सोडविले, वित्तीय संस्थांची देणी दिल्याने सभासदांना या निवडणूकीत निळकंठेश्वर पॅनेल पाटींबा मिळेल, यात शंका वाटत नाही,` असे मत केशवराव जगताप यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे म्हणाले, 'माळेगावचे आग्रस्थान टिकविणे ही सामूहिक जबाबदारी आहे. अर्थात आजवरच्या आजी-माजी संचालक मंडळाने तन-मन-धनाने काम करून माळेगावच्या प्रगतीमध्ये आपल्या कर्तृत्वाची छाप उमटली आहे.

हा कारखाना ऊस दराबाबतीत राज्यात अग्रगण्य साखर कारखान्यांशी स्पर्धा करू इच्छीत आहे. दर्जेदार साखर निर्मितीबरोबर वीज, इथेनाॅलसारखे अधिकाधिक उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्यासाठी संचालक मंडळाने शर्थिचे प्रयत्न चालविले आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून या कारखान्याने कार्यक्षेत्रात ऊस उत्पादन वाढविण्यासाठी एआय तंत्रज्ञान (कृत्रीम बुद्धीमत्ता) राबविण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्याला सभासदांनी मान्यता दिलेली आहे.त्यासाठी यापुढील काळात संचालक मंडळ व कामगारांच्या योग्य समन्वयातून कमी कालावधीत वरील प्रकल्प यशस्वी करण्यात येईल.

त्याचा परिणाम अधिकच्या भावामध्ये दिसून येईल. सहकाराच्या माध्यमातून ही सर्व होऊ पाहत असलेली प्रगती अधिक गतीने पुढे नेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादांनी माळेगावच्या निवडणूकीत आपली उमेदवारी कायम ठेवली आहे.`

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.