नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे (NEP) आता भारताने जगातील सर्वोत्तम विद्यापीठांसाठी आपले दरवाजे खुले केले आहेत. त्यामुळे नवीमुंबईत जागतिक दर्जाचे शिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होत आहे. आज 5 आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना नवी मुंबईतील एज्युसिटीमध्ये आपले कॅम्पस स्थापन करण्यासाठी ‘लेटर ऑफ इंटेंट'(LOI) देण्यात आले. लवकरच आणखी 5 परदेशी विद्यापीठे येथे आपले कॅम्पस सुरू करतील अशा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र यांनी येथे व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज मुंबई येथे एमपीएसटीएमई आणि एनएमआयएमएस इमारतींचे उद्घाटन, तसेच एसव्हीकेएम शैक्षणिक संकुलाचे भूमिपूजन झाले,त्यावेळी ते बोलत होते.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, आता भारताने जगाच्या सर्वोत्तम विद्यापीठांसाठी आपले दरवाजे खुले केले आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे ते शक्य झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आज पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना नवी मुंबईतील एज्युसिटीमध्ये आपले कॅम्पस स्थापन करण्यासाठी ‘लेटर ऑफ इंटेंट’ देण्यात आले. लवकरच आणखी 5 परदेशी विद्यापीठे येथे आपले कॅम्पस सुरू करतील. यामुळे एक व्यापक शैक्षणिक परिसर आकार घेणार आहे. आपल्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण येथेच मिळणार आहे. यामुळे परदेशी शिक्षण परवडत नसल्यामुळे भारतातच राहणाऱ्या विद्यार्थ्यांना कमी खर्चात आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळेल आणि परदेशात शिक्षणासाठी खर्च होणारे परकीय चलनही वाचेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
स्पर्धाच विकासाला चालना देते. एकदा शिखर गाठले की आणखी वर जाता येत नाही, पण स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला नवी उंची गाठता येते. आता आपल्या शैक्षणिक संस्थांना देशातील नव्हे तर आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी स्पर्धा करावी लागेल. दोन-तीन वर्षांनंतर या संस्थांची परस्पर तुलनादेखील होईल, आपण कोठे आहोत, हे तपासले जाईल. ही स्पर्धा आपल्याला अधिक सक्षम करेल, असाही विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
21 व्या शतकात उद्योग आणि व्यवसाय केवळ संसाधनांच्या आधारे नव्हे, तर जिथे इनोव्हेशन (नवकल्पना) आणि सक्षम मनुष्यबळ उपलब्ध आहे, तिथेच विकसित होतात. म्हणूनच भारताला विकसित राष्ट्र करण्यासाठी आपल्याला उच्च गुणवत्ता असलेले मनुष्यबल घडवावे लागेल.पूर्वी आपली शैक्षणिक व्यवस्था खूप धीम्या गतीने बदल स्वीकारत असे. अभ्यासक्रमात बदल होईपर्यंत जग खूप पुढे गेलेले असे. परंतु आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण व्यवस्थेत लवचिकता आली असून शिक्षण ‘स्टॅटिक’ऐवजी ‘डायनॅमिक’ झाले आहे. यामुळे मल्टीडिसिप्लिनरी अभ्यासक्रम शक्य होतो आणि उद्योगांची मागणी असलेले तंत्रज्ञान-केंद्रित मनुष्यबल निर्माण करता येते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पूर्वी तंत्रज्ञानाची एक पिढी बदलायला 7 वर्षांचा कालावधी लागायचा, मग तो कालावधी तंत्रज्ञानामुळेच 3 वर्षांवर आला. आता एआयमुळे प्रत्येक 3 महिन्यांनी तंत्रज्ञानाची नवी पिढी तयार होते, म्हणून ‘लर्न, अनलर्न आणि रिलर्न’ हा आजचा मंत्र आहे. हा मंत्र आपलासा करण्याची क्षमता असलेलेच पुढे जातील. भारतीय विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत आपली क्षमता सिद्ध करीत आहेत आणि त्यामुळे नव्या शक्यता खुल्या होत आहेत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आगामी काळात स्टार्टअप इकोसिस्टम अधिक बळकट करणे गरजेचे आहे. आज महाराष्ट्र आणि मुंबई भारताची स्टार्टअप कॅपिटल आहे. ‘स्टार्टअप इंडिया’च्या अहवालानुसार महाराष्ट्र गुंतवणूक आणि ‘स्टार्टअप’ संख्येतही देशात क्रमांक एकवर आहे. महाराष्ट्र शासनाने स्टार्टअप्ससाठी ‘फंड ऑफ फंड्स’ तयार केला आहे आणि त्याद्वारे शेकडो स्टार्टअप्स उभे राहिले आहेत. तरुणांची ही ताकद आपल्याला ओळखून त्यांना पोषक वातावरण देण्याची जबाबदारी शासनासह शैक्षणिक संस्थांची आहे. या पद्धतीने आपण रोजगार मागणारे नव्हे तर रोजगार निर्माण करणारे, देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणारे उद्योजक घडवू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. या कार्यक्रमाला आमदार अमित साटम, आमदार पराग अळवणी, एनएमआयएमएस विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अमरीश पटेल, एसव्हीकेएमचे अध्यक्ष भूपेश पटेल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.