पुणे - फळपीक विमा योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी ‘जिओ टॅगिंग’ यंदा सक्तीने तपासले जाणार आहे. फळबागेचे क्षेत्र ई-पीकपाहणीशी न जुळल्यास विमा अर्ज रद्द होणार आहे. दरम्यान, अर्ज दाखल करण्यासाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ द्यावी, असा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
कमी पाऊस, जास्त पाऊस, पावसातील खंड, जास्त आर्द्रता यामुळे फळबागेतील उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो. यातून होणाऱ्या आर्थिक नुकसान काळात शेतकऱ्यांना फळपीक विम्यातून मदत मिळते. विमा अर्ज दाखल करण्यासाठी मोसंबी व चिकूकरिता ३० जूनपर्यंत, डाळिंबासाठी १४ जुलैपर्यंत, तर सीताफळासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत आहे.
विमा उतरवलेल्या फळबागाचा जिओ टॅगिंग असलेले छायाचित्र सादर करणे अनिवार्य असते. परंतु अनेकदा छायाचित्र जोडले जात नाही. त्यासाठी कृषी विभागदेखील कठोर भूमिका न घेता जिओ टॅगिंगसाठी मुदतवाढ देत असते. परंतु यंदा जिओ टॅगिंग सक्तीने तपासले जाणार आहे.
‘जिओ टॅगिंगची अट यापूर्वीही होती. परंतु अटीच्या पालनासाठी फारसा आग्रह धरला जात नव्हता. यंदा मात्र या अटीची अंमलबजावणी केली जाणार आहे,’’ अशी माहिती कृषी विभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
विमाधारक शेतकऱ्याला अॅग्रीस्टॅक म्हणजेच शेतकरी नोंदणी क्रमांक (फार्मर आयडी) यंदा सक्तीचा करण्यात आला आहे. अर्जदार शेतकऱ्याला आधार पत्र व बॅंक खाते पुस्तिकेची पत्र, शेतजमिनीचा उतारा द्यावा लागेल. याशिवाय ई-पीकपाहणीचा पुरावा यंदाही बंधनकारक राहील.
कारण, फळबागेच्या मूळ आकाराची योग्य नोंद ई-पीकपाहणीत नसल्यास विमा अर्ज रद्द केला जाणार आहे. मात्र विमा योजनेत भाग घेताना ई-पीकपाहणी सक्तीची नाही. जुलै किंवा ऑगस्ट महिन्यातदेखील शेतकरी आपापली ई-पीक नोंदणी करू शकतील, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.
फळपीक विमा योजनेच्या ‘मृग बहर-२०२५’ साठी www.ncip.gov.in या संकेतस्थळावर राज्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांकडून अर्ज दाखल केले जात आहेत. मात्र, आधीच्या वेळापत्रकाप्रमाणे लिंबू, द्राक्ष, पेरू, संत्रा या चार फळपिकांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत शनिवारी (ता. १४) समाप्त झाली.
कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, या पिकांसाठी विमा सहभागाचे अर्ज दाखल करण्यास शेतकऱ्यांना पुरेसा वेळ मिळालेला नाही. मुदतवाढीसाठी चारपैकी तीन कंपन्यांचा होकार आला आहे. चौथी कंपनीदेखील मुदतवाढीला तयार आहे. त्यामुळे ३० जूनपर्यंत मुदतवाढ मिळावी, असा प्रस्ताव केंद्राला पाठविण्यात आला आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यास किमान एक आठवड्याची मुदतवाढ मिळण्याची अपेक्षा आहे.
फळपीक विमा योजनेत मृग बहरासाठी अर्ज दाखल करण्याची काही पिकांची अंतिम मुदत संपली आहे. परंतु आम्ही केंद्राला प्रस्ताव पाठवून मुदतवाढ मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
- विनयकुमार आवटे, कृषी संचालक, प्रक्रिया व नियोजन विभाग