एकेकाळी शेकडो रुग्णांना जीवदान देणारे हात… आज उपाशी पोटासाठी ताट पुढं करत आहेत. कधी शस्त्रक्रिया करून जीव वाचवणारे डॉ. संदीप सखाराम सकपाळ आज स्वतःच्या आजारपणात बेवारस झाले आहेत. मुंबईत यशस्वी वैद्यकीय कारकीर्द गाजवणाऱ्या या निष्णात डॉक्टरला वयाच्या ४९व्या वर्षी नाशिकच्या सीबीएस बसस्थानकाजवळ भीक मागावी लागत आहे. त्यांच्या आजारासाठी कागदपत्रं नाहीत, उपचारासाठी पैसे नाहीत आणि आयुष्यभर जपलेलं कुटुंबही आता त्यांच्या पाठीशी उभं नाही, याची खंत डॉ. सकपाळ यांना आहे. (Mumbai doctor who saved thousands of patients’ lives is begging in Nashik)
या डॉक्टरच्या म्हणण्यानुसार, त्यांना नाशिकमध्ये नातलगही आहेत. मात्र, ११ महिन्यांपासून त्यांची कोणी माणुसकी भावनेतून भेट घेतली नाही की त्यांची विचारपूसही केली नाही. अशा प्रतिकूल व असुरक्षित वातावरणात रामकुंड परिसरातील माणुसकी बेघर निवारा व पुनर्वसन केंद्र त्यांच्यासाठी आशेचा किरण ठरले आहे. या केंद्राने त्यांना मायेचा आसरा दिला असून, त्यांच्या खुब्याच्या शस्त्रक्रियेसाठी संचालकांकडून प्रयत्न केले जात आहेत.
डॉ. संदीप सखाराम सकपाळ हे होमिओपॅथी डॉक्टर आहेत. त्यांनी बीएचएमएसचे शिक्षण घेतलेले आहे. ते मूळचे मुंबईतील विक्रोळीमधील टागोरनगरमध्ये वास्तव्य करत होते. वैद्यकीय क्षेत्रात असल्याने त्यांचे राहणीमानही तितकेच चांगले असायचे. ते मुंबईतील मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये वैद्यकीय पॅक्टीस करायचे. त्यातून त्यांना दरमहिन्याला एक ते दीड लाख रुपये मिळायचे. त्यांचे मुंबईत घर, बँकखात्यात लाखो रूपये होते. मात्र, एका अपघाताने त्यांचे आयुष्यच बदलून गेले. अपघातामुळे त्यांची रुग्णसेवा थांबली आणि सोबत असलेली माणसे दूर जावू लागली. अपघातातून ते कसेबसे बरे झाले. मात्र, आजही त्यांच्या डाव्या पायाच्या खुबा दुखत आहे. त्यावर ते शस्त्रक्रियेसाठी व पुढील आयुष्य जगण्यासाठी पैशांची गरज होती. मात्र, त्यांना कोणीही आर्थिक मदत केली नाही. आधी पैसे असल्याने रक्ताची माणसेही त्यांच्यासोबत असायची. शिवाय, त्यांचे अनेक मित्र त्यांच्यासोबत राहून मौजमजा करायचे. मात्र, अपघातामुळे दरमहिन्याला येणारे पैसे बंद झाले. दरम्यान, त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांचे घर व आयुष्याशी पुंजी पत्नी व मुलांकडे गेली. शिवाय, पैसे नसल्याने मित्रपरिवारही दूर गेला. त्यातून ते खचले. त्यांना जीवन नकोसे झाले होते. शेवटी मुंबई सोडून ते भावाच्या आशेवर नाशिकला आले. मात्र, त्यानेही त्यांच्या बोलणे टाळले.
डॉ. सकपाळ नाशिक शहरातील सीबीएस बसस्थानकात भीक मागून दिवस काढू लागले. या ठिकाणी ते दोन महिने होते. दरम्यान, रामकुंड परिसरातील माणुसकी बेघर निवारा व पुनर्वसन केंद्राचे संचालक यशवंत लाकडे यांना सीबीएस परिसरात एक ४९ वर्षीय भिकारी हा मुंबईमधील निष्णात डॉक्टर असल्याचे समजले. त्यांचे हालकीचे जीवन पाहून लाकडे यांनी त्यांना आधार दिला. या केंद्रात डॉ. सकपाळ ११ महिन्यांपासून राहत आहेत. उतारवयात आज कोणीही सोबत नसल्याने आणि डाव्या खुब्याचा त्रास असह्य होत असल्याने ते दर शनिवारी सीबीएस परिसरात भीक मागत असल्याचे, लाकडे यांनी सांगितले.
डॉ.संदीप सकपाळ हे सीबीएस परिसरात ओळख लपवून भीक मागातून आढळून आले. त्यांचा ११ महिन्यांपासून सांभाळ करत आहे. त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे नसल्याने शासकीय योजनेतून त्यांच्या डाव्या खुब्याच्या शस्त्रक्रियेसाठी अडचणी येत आहेत. माणुसकी बेघर निवारा केंद्रास कोणतेही अनुदान मिळत नाही. या ठिकाणी बेघर व्यक्तींची मोफत अन्न, वस्त्र व निवार्याची व्यवस्था केली जाते. त्याच्या शस्त्रक्रियेसाठी पैसे नसल्याने सामाजिक दातृत्वाच्या भावनेतून कोणी मदत करते का, याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
यशवंत लाकडे, संचालक, माणुसकी बेघर निवारा व पुनर्वसन केंद्र, रामकुंड, नाशिक
मुंबईत २० वर्षे रुग्णसेवा केली. काही वर्षांपूर्वी अपघातात डाव्या खुब्याला गंभीर इजा झाली. खुब्यामुळे चालता येत नाही की नीट बसता येत नाही. रक्ताच्या नात्यातील माणसांसह आणि मित्रांनी साथ सोडली आहे. एक शर्ट व एका पॅन्टवर नाशिकला आलो. सीबीएस परिसरात दोन महिने कसेबसे दिवस काढले. बेघर निवारा केंद्राने आधार दिल्याने जगण्याची आशा मिळाली. सोबत कोणी नसल्याने आणि खुब्या वेदनेमुळे जगण्याची इच्छा नव्हती पण नाशिकमध्ये जगण्याची आशा मिळाली आहे.
डॉ. संदीप सकपाळ, मुंबई
डॉ. संदीप सकपाळ यांच्या शस्त्रक्रियेसाठी दानशूर व्यक्तींनी आर्थिक स्वरूपात मदत करण्यासाठी रामकुंड परिसरातील माणुसकी बेघर निवारा व पुनर्वसन केंद्राचे स्टेट बँक ऑफ इंडिया, जुना आग्रा रोड, नाशिक येथे उदय बहुउद्देशिय सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या नावे बँक खाते आहे. या बँक खात्याचा क्रमांक ३१९६२१३०३८८ असून, आयएफसी कोड क्रमांक आहे. अधिक माहितीसाठी बेघर निवारा केंद्राचे संचालक यशवंत लाकडे यांच्याशी मोबाईल क्रमांक ९३७३९५७४३५ यावर संपर्क साधता येईल.