संस्कृती सोहळा – तुकोबारायांची पालखी आणि हिंदू-मुस्लिम सौहार्द
Marathi June 15, 2025 02:25 PM

>> डॉ.? सुनीलकुमार सरनाईक

सामाजिक सलोख्याचा प्रत्यय वारकरी संप्रदाय कायमच देत आलाय. या संप्रदायातील सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱया चालीरीती समाजात दुहीचा विचार पेरणाऱयांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालतात. हिंदू-मुस्लिम समन्वयाचा इतिहास सांगणाऱया अशाच एका परंपरेविषयी व बुधवार दिनांक 18 जून रोजी परंपरेने क्षेत्र देहू येथून आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज यांच्या पालखी पादुकांचे प्रस्थान होत आहे, यानिमित्ताने…

प्रतिवर्षी आषाढी वारीच्या निमित्ताने जगद् गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानासाठी देहूनगरीत मोठय़ा संख्येने भक्तांचा जनसागर लोटला जातो. पहिल्या दिवशी तुकाराम महाराजांची पालखी देहूमध्येच इनामदारवाडय़ात मुक्कामास असते. तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होताच, क्षेत्र देहू येथे हिंदू-मुस्लिम एकतेचं दर्शन घडतं. जातीधर्माच्या पलीकडे गेलेला वारकरी संप्रदाय आणि तुकोबारायांचा पालखी सोहळा अवघ्या जगाला एकात्मतेचा संदेश देतो. कारण गेल्या शेकडो वर्षांपासून तुकाराम महाराजांची पालखी देहूतून प्रस्थान ठेवल्यानंतर पहिला विसावा घेते ती हजरत अनगडशाह बाबांच्या दर्ग्यात. दर्ग्यासमोरील मेघडंबरीत तुकाराम महाराजांची पालखी ठेवली जाते. ही मेघडंबरी अभंग-आरतीस्थान म्हणून ओळखली जाते. अनगडशाह बाबांच्या समाधीसमोर तुकाराम महाराजांची पालखी आल्यानंतर तिथे अभंग गायले जातात. यादरम्यान दर्ग्यात पालखीची पूजाही केली जाते. पुढे वारी पंढरपुराकडे मार्गस्थ होताना वारकरी अनगडशाह बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन पुढील प्रवासाला निघतात.

अनगडशाह बाबा आणि तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याची सुमारे चारशे वर्षांची परंपरा आहे. हिंदू-मुस्लिम समाजाची एकता-समता-बंधुभाव यांचे प्रतीक म्हणून ही प्रथा आजही जपली जाते. तुकाराम महाराज आणि अनगडशाह बाबा या दोन संतांच्या भेटीचे प्रतीक म्हणून या भेटीकडे आजही पाहिले जाते. या भेटीचे साक्षीदार होण्यासाठी हजारो हिंदू-मुस्लिम भाविक या ठिकाणी येतात.

तुकाराम महाराजांच्या 'अल्ला एक तू, नाबी एके तू तूअल्ला डेव्हिल डिलावे.अल्ला करे म्हणून होय, बाबा कार्टारची सिरटज.यांसारख्या अभंगांमधून हिंदू-मुस्लिम सलोखा, समता, बंधुभाव, ममता, एकात्मता यांच्या खुणा दिसून येतात. अनगडशाह बाबा हे स्वत वारकरी संप्रदायातील होते. त्यामुळे जेव्हा त्यांचा उरुस भरतो, तेव्हा त्यांचे मुस्लिम भाविक दर्ग्यात कोणतीही कुर्बानी देत नाहीत किंवा मांसाहारी पदार्थाचा नैवेद्य दाखवला जात नाही. बाबांच्या समाधीसमोर गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो.

तुकाराम महाराजांच्या चरित्रकारांपैकी एक पांडुरंग बालाजी कवडे ‘संतश्रेष्ठ तुकाराम महाराज’ या आपल्या ग्रंथात अनगडशाह यांच्याविषयी लिहितात…‘देहूपासून काही अंतरावर चिंचवड हे गाव आहे. तुकाराम महाराजांच्या काळी चिंचवड येथे मोरया गोसावी (चिंतामणी देव) या नावाचे एक गणेशभक्त राहात होते. ते महान भक्त असून त्यांना सिद्धी प्राप्त झाली होती, त्याच्यासंबंधी पुणे प्रांतात प्रसिध्दी होती. त्या काळी पुणे शहरात अनगडशाह या नावाचे मुसलमान फकीर होते, ते ईश्वरभक्त असून मोठे अवलिया होते. भक्तीच्या जोरावर त्यांना सिद्धी प्राप्त झाली होती. ते चिंचवड येथे चिंतामणी देवाच्या भेटीस गेले. चिंतामणी देवाच्या वाडय़ासमोर अनगडशाहांनी भिक्षेची आरोळी ठोकली. चिंतामणी देवांनी त्यांना भिक्षा वाढण्यास सांगितले. भिक्षा वाढण्यास आलेल्या इसमास अनगडशाह म्हणाले, ‘कटोरा भरून पाहिजे.’ फकिराची इच्छा चिंतामणी देवास कळविली. त्यांनी कटोरा भरून भिक्षा वाढण्यास सांगितले. भिक्षा बरीच वाढली तरी कटोरा काही भरत नाही, ही आश्चर्यकारक गोष्ट चिंतामणी देवास सांगण्यात आली. त्यांनी धान्याची पेवे उघडून भिक्षा घालण्यास सांगितले, तरी अनगडशाह सिद्धीच्या जोरावर कटोरा भरू देईनात. याचे मुख्य कारण चिंतामणी देवाने जाणले. ते स्वत उठले व बाहेर आले. त्याने सिद्धी-सामर्थ्याने कटोरा भरविला. पण फकिराने सिद्धीच्या बळावर तो तत्काळ रिकामा केला. त्यावेळी चिंतामणी देवांस अनगडशाहांची खरी योग्यता कळली. त्यांनी अनगडशाहांचा सन्मान केला व त्यांना वाडय़ात आणून बसविले. तुकाराम महाराजांचे साधुत्व व कीर्ती अनगडशाहाच्या ऐकिवात होती. त्यांचीही परीक्षा घेण्याचे त्यांनी ठरविले. अनगडशाह देहू गावी आले. त्यांनी तुकाराम महाराजांच्या दाराशी भिक्षेची आरोळी ठोकली. ‘आपल्या दाराशी भिक्षा मागण्यास आलेल्या कोणासही घरात धान्य असल्यास देत जाणे. नसल्यास गोड शब्दाने बोलून समाधानपूर्वक निरोप देणे,’ असे महाराजांचे जिजाबाईस सांगणे होते. पतिदेवाची आज्ञा जिजाबाई तंतोतंत पाळीत असे.

फकीराने भिक्षा मागताच जिजामातेने मुलगी गंगू हीस सांगितले, ‘मडक्यातील त्या फकीरास पीठ वाढ..!’ गंगूने आपल्या चिमकुल्या हाताच्या ओंजळीत पीठ घेतले व फकीराच्या कटोऱयात टाकले. पीठ कटोऱयात पडताच कटोरा भरून खाली सांडू लागला. हे दृश्य पाहून अनगडशाह एकदम चकित झाले. सिद्धीसामर्थ्याचा विसर पडून ते त्या मुलीकडे आश्चर्याने पाहतच उभे राहिले. नंतर त्यांनी प्रश्न केला, ‘तुझे नाव तुकाराम?’ हे ऐकून गंगूस हसू आले. ती म्हणाली, ‘तुकाराम माझे बाबा आहेत. ते कोठेतरी भजन करीत असतील.’ अनगडशाह न थांबता महाराजांच्या दर्शनास गेले. नंतर ते देहूस वरचेवर येऊ लागले. शेवटचे दिवस देहूत घालवून तेथेच त्यांनी देहाचे विसर्जन केले. त्यांची समाधी (कबर) देहू गावाजवळ आजही सुस्थितीत आहे. त्या समाधीची सर्व व्यवस्था महाराजांच्या वंशजाकडून होत आहे. वरील आख्यायिका अनेक चरित्रकारांनी आपल्या पुस्तकात लिहिली आहे.

तुकाराम महाराजांचा नावलौकिक ऐकून अनगडशाह पुण्याहून देहू या गावी आले होते. तेव्हा त्यांना तुकाराम महाराजांच्या दिव्यत्वाची प्रचिती आली. तुकाराम महाराजांची विठोबाविषयीची भक्ती श्रद्धा तसेच तुकाराम महाराजांचा दानशूरपणा पाहून या मुस्लिम अवलिया संताने त्यांच्याशी सौहार्दाचे संबंध जोडले. पुढे दोघांमध्ये मैत्रीचे नाते तयार झाले. देहूतील अंधेरीबाग या ठिकाणी अनगडशाह राहत असत. याच ठिकाणी मागील तीनशेहून जास्त वर्षांपासून तुकाराम महाराजांची पालखी थांबते. आजही अनगडशाह बाबा दर्ग्याच्या पुजाऱयाचा मान हिंदुधर्मीय मुसुडगे कुटुंबाकडे आहे. तुकाराम महाराजांचे वंशज माणिक महाराज मोरे सांगतात, ‘तुकाराम महाराजांची जीवनप्रणाली ज्या तत्त्वानं कार्यरत झाली ते सर्वधर्म समभावाचं तत्त्व आहे. याच भक्तिसंप्रदायाच्या चळवळीत तुकाराम महाराजांना सगळ्या धर्मांच्या लोकांनी मदत केली. त्यामुळे हे मंदिर भक्तिसंप्रदायाचं प्रतीक आहे. तुकाराम महाराजांनी आयुष्यभर जात-धर्म भेद बाजूला ठेवून काम केलं. अनेकांचा उद्धार केला. त्याकाळी अनगडशाह बाबा तुकाराम महाराजांसोबत कीर्तनालादेखील जात असत. त्यानंतर तुकाराम महाराजांनी त्यांच्या जमिनीचा काही भाग अनगडशाह बाबा यांना दिला. त्यामुळे मागील कित्येक वर्षापासून पालखीने प्रस्थान ठेवले की, पहिले कीर्तन व आरती बाबांच्या दर्ग्यात होते. हिंदू- मुस्लिमांचे वादांचा पालखी सोहळ्यावर किंवा अनगडशाह बाबांच्या दर्ग्यावर कोणताही परिणाम झालेला नाही आणि होतही नाही.’

याबाबत अधिक बोलताना माणिक महाराज सांगतात, ‘संत हे जाती-धर्माच्या पलीकडे गेलेले असतात. जोपर्यंत माणसाला एखाद्या गोष्टीचा खरा अर्थ कळत नाही तोपर्यंत माणूस काठीचा आधार घेऊन चालत असतो. मात्र, ज्या वेळी समग्र जगाचं कल्याण संतांना कळतं त्यावेळी स्थिती बदलते. मग संतापुढे, संतांनी दिलेल्या अखिल मानवतेच्या शिकवणुकीपुढे समाज नतमस्तक होत असतो. महाराष्ट्राची सामाजिक, आध्यात्मिक जडणघडण आणि सामाजिक सलोखा कायम ठेवण्यात अशाच कृती महत्त्वाच्या ठरत आल्या आहेत. अशा उदाहरणांनी सामाजिक वीण अधिकाधिक मजबूत होण्यास मदत होते. त्यामुळे राज्यात किंवा देशात धार्मिक तेढ वाढवणाऱया घटना घडत असल्या तरी तुकाराम महाराजांची पालखी आणि अनगडशाह बाबांचा दर्गा आपली सामाजिक वीण उसवू देत नाहीत.

अनगडशाह बाबा दर्ग्याचे भाविक सुहेल अत्तार सांगतात, ‘माझे आजोबा अबुल अत्तार माळकरी होते, ते एकादशीचा उपवास करायचे. दरवर्षी आषाढी वारीला जायचे. अनगडशाह बाबांइतकीच आमची संत तुकाराम महाराजांवरही श्रद्धा आहे.’

अनगडशाह बाबांच्या दर्ग्याच्या गाभाऱयात चादर पांघरलेली कबर आहे. तिथे अरबी भाषेत कुराणातील ‘आयात’ (श्लोक) छापलेल्या आहेत. या दर्ग्यात नेहमीच मोगरा, गुलाब, जास्वंद या फुलांनी सजावट केलेली असते. एका भिंतीच्या कोनाडय़ात तेलाचा दिवा ठेवलेला आहे व तो अहोरात्र तेवत असतो. कोपऱयात दोन मोरपिसं आणि भिंतीवर ‘चाँद-तारा’ची प्रतिकृती आहे. इथली पूजा ज्येष्ठ नागरिक पोपट बिरदवडे व गोविंद मुसुडगे करतात. अक्षय्यतृतीयेला अनगडशाह बाबांचा उरूस असतो. सर्वधर्मीय भाविक या उरुसात मोठय़ा उत्साहाने सहभागी होत असतात.

[email protected]

(लेखक मानसशास्त्र व लोककलेचे अभ्यासक आहेत.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.