नागपूर : समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचविण्यासाठी सरकार कटीबद्ध असून घरकुलापासून कोणीही वंचित राहू नये, अशी शासनाची भूमिका आहे. मिहान प्रकल्पग्रस्त खापरी(रेल्वे)सह चार गावांतील शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पुनर्वसनाचा लाभ पोहोचवल्याचे शनिवारी महसूल व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान तथा १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांच्या विद्यमाने मिहान येथील पुनर्वसित अभिन्यासातील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात आयोजित मौजा खापरी (रेल्वे) येथील पात्र ५०० प्रकल्पग्रस्तांना बावनकुळे यांच्या उपस्थितीत पट्टे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे सीईओ विनायक महामुनी व इतर उपस्थित होते. बावनकुळे म्हणाले, गेल्या १५ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या मिहान प्रकल्पग्रस्तांचे राज्य शासनाने पुनर्वसन करून त्यांना न्याय मिळवून दिला आहे.
या भागातील कलकुही, दहेगाव, तेल्हारा या गावांचे पुनर्वसन झाले. मात्र, खापरी गाव पुनर्वसनापासून वंचित होते. २०१५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खापरी गावाच्या पुनर्वसनाचा विषय प्राधान्याने मार्गी लावण्याचा निर्णय घेतला.
जिल्हा प्रशासनाने आवश्यक शासकीय बाबी पूर्ण करून खापरीतील ७६५ लाभार्थ्यांना पट्टे वाटपाचा मार्ग मोकळा केला. ज्या पात्र लाभार्थ्यांना पुनर्वसनाचा लाभ मिळाला नाही त्यांनी नव्याने अर्ज करावा. लाभ प्राप्त व्यक्तींनी पुन्हा अर्ज करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी बावनकुळे यांच्या हस्ते सहा लाभार्थ्यांना प्रातिनिधिकरित्या पट्टे वितरित करण्यात आले.
जनतेशी संवादाचा नागपूर पॅर्टन राज्यव्यापी व्हावानागपूर (ग्रा.) उपविभागीय कार्यालयामार्फत परिक्षेत्रातील गावांमध्ये जनतेचे प्रश्न जनतेच्या गावात या संकल्पनेवर आठवड्यातील दोन दिवस जनतेशी संवादाचा कार्यक्रम राबवून जनतेचे प्रश्न गावातच सोडविण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात अन्यत्रही हा उपक्रम प्रभावीपणे राबवावा आणि जनतेचे प्रश्न सोडविण्याच्या नागपूर पॅर्टनचा विस्तार होऊन तो राज्यात राबविला जावा, अशी अपेक्षा बावनकुळे यांनी व्यक्त केली.