ईराणची राजधानी तेहरान सध्या भलत्याच संकटाचा सामना करत आहे. एकीकडे इस्रायलने प्रत्युत्तरा दाखल केलेल्या हवाई हल्ल्याने दहशत निर्माण झाली आहे. दुसरीकडे राजधानीत रस्त्यावर प्रचंड सीवेज संकट निर्माण झालं आहे. तसेच रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याने लोकांचं जगणं मुश्किल झालं आहे. इस्रायलच्या हल्ल्याने केवळ सैन्य तळांचं नुकसान झालेलं नाही तर तेहरानमधील जमिनीखालील सीवर आणि पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनवरही मोठा परिणाम झाला आहे. हल्ल्यामुळे सीवर लाई फुटल्याने रस्त्यावर घाणेरड्या पाण्याचा पूर आला आहे. पुरासारखी स्थिती बनली असून घरात पाणी शिरून घरं बुडायला लागली आहेत.
तेहरानमधील लोक रस्ता पार करण्यासाठी विट, लाकडांच्या माध्यमातून तात्पुरता पूल बनवून चालत आहेत. काही दुकानांमध्ये घाणेरडं पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचा व्यापार ठप्प झाला आहे. अनेक घरात घाणेरडं पाणी घुसलं आहे. अनेक घरात तर बाथरूममधील पाणी उलटं वाहत आहे. त्यामुळे लोकांना घर सोडून दुसरीकडे राहायला जावं लागत आहे.
बॉम्बपेक्षा दुर्गंधी डेंजर
ईराणच्या स्थानिक प्रशासनानेही युद्धामुळे काही मुलभूत सुविधांवर गंभीर परिणाम झाल्याचं मान्य केलं आहे. पाइपलाइनच्या दुरुस्तीसाठी अभियंत्यांची टीम तैनात करण्यात आली आहे. पण सातत्याने संरक्षण अलर्ट आणि सायरनांचा आवाज येत असल्याने अशा परिस्थितीत काम करणं कठिण झालं आहे. आम्ही आधी बॉम्बला घाबरायचो. आता दुर्गंधी आणि आजाराचा फैलाव होण्याची भिती वाटत असल्याचं एका स्थानिक व्यक्तीने सांगितलं.
डेंग्यू, कॉलराची भीती
दरम्यान, परिस्थिती नियंत्रणा आली नाही तर डेंग्यू, कॉलरा आणि इतर आजार फोफावण्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. तर अशा प्रकारच्या घटना युद्धातील कधी न भरून निघणारं नुकसान असतं असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. अशा घटनेमुळे सैन्य तळांपेक्षा सामान्य लोकांना रोजच्या त्रासाला सामोरे जावं लागतं, असंही या तज्ज्ञांनी म्हटलं आहे. दरम्यान, तेहरान सध्या संकटात आहे. जोपर्यंत परिस्थिती नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत लोकांना एक एक दिवस भीती आणि समस्यांमध्ये घालवावा लागणार आहे.