पुणे : पर्यटकांच्या अतिभारामुळे इंद्रायणी नदीवरील कुंडमळा (ता. मावळ) येथील सुमारे 35 वर्षे जुना साकव (पूल) रविवारी (ता. 15 जून) दुपारी साडेतीनच्या सुमारास कोसळला. यात चौघांचा मृत्यू झाला असून 50 हून अधिक जणांना वाचण्यात यश आले आहे. तर 34 हून अधिक किरकोळ, तर 6 गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे कुंडमळा येथे फिरकले नसल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. अजित पवार हे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मग्न आहेत. त्यामुळे या घटनेची जबाबदारी कोणाची? बळींचे उत्तर कोण देणार? असा सवाल उपस्थित होत आहे. (After the Kundmala bridge accident on the Indrayani river, Ajit Pawar did not visit the site even when he was the guardian minister of Pune)
स्व. खासदार अण्णा जोशी यांच्या खासदार निधीतून सुमारे दहा लाख रूपये खर्चून कुंडमळा (इंदोरी) हा पूल बांधण्यात आला होता. पंचक्रोशीतील गावातील नागरिकांना पायी ये-जा करण्यासाठी बांधलेला हा अरूंद असा लोखंडी पादचारी पूल होता. पादचारी मार्ग असला तरी दुचाकीचा मोठ्या प्रमाणावर वापर या पुलावरून केला जात होता. कुंडमळा येथे नवा पूल उभारण्यात यावा, अशी ग्रामस्थ आणि स्थानिकांची मागणी होती. त्याअनुषंगाने तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डिसेंबर 2022 मध्ये रस्ते विकास सचिवांना नवीन पुलाचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली होती आणि त्यांनीच गेल्या वर्षी 11 वर्षी 2024 रोजी सुमारे आठ कोटी रूपये खर्चाच्या जोडरस्त्यासह पुलाला मंजुरी दिली होती. पण, मार्किंग वगळता प्रत्यक्ष कामाला मंजुरी दिली नाही.
एकीकडे पुलाला मुंजरी दिली असताना दुसरीकडे प्रत्यक्ष काम झाले नाही, त्यातच पर्यटकांची कुंडमळा येथे होणारी गर्दी पाहता पुलावर जाण्यासाठी मनाई करण्यात आली होती. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याने कुंडमळा येथे ‘धोकादायक पूल/साकव, नागरिकांनी पूल/साकवाचा वापर जाणे-येण्यासाठी करू नये,’ असा फलक लावला होता. पण, घटना घडली, तेव्हा तो फलक पूलाखाली कचऱ्यात पडलेला आढळला.
हेही वाचा – Congress : खोदा पहाड़ निकला चूहा, जनगणनेच्या अधिसूचनेवर काँग्रेसचा टोला; मोदींवर साधला निशाणा
घटना घडल्यावर तातडीने ‘एनडीआरफ’ची टीम घटनास्थळी दाखल झाली. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, मावळचे आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री बाळ भेगडे यांच्यासह जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयुकमार चौबे आदींनी घटनास्थळी भेट देऊन जखमी, बेपत्ता आणि मृत नातेवाईकांची भेट घेतली. पण, पुण्याचे कारभारी अर्थात पालकमंत्री अजित पवार हे घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशीही कुंडमळा येथे गेले नसल्याने त्यांच्यावर टीका होत आहे.
काही दिवसांपूर्वी बारामती तालुक्यात मुसळधार पाऊस पडला होता, त्यानंतर दिल्लीतील ‘एनडीए’ची बैठक सोडून अजित पवार थेट बारामतीला आले होते. त्यानंतर सकाळी सहा वाजता अजित पवार यांनी बारामतीतील नुकसानीची पाहणी केली होती. अजित पवार यांचे बारामतीवर निस्सीम प्रेम सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे बारामतीत पडलेल्या पाऊसानंतर आणि झालेल्या नुकसानीची पाहणी ते करणारच होते, परंतु, आता कुंडमळा येथे घडलेल्या घटनेनंतर ते तिथे न गेल्यामुळे टीकेचे धनी बनले आहेत.
हेही वाचा – Prakash Ambedkar : आपले पंतप्रधान भित्रे भागूबाई; इस्रायल-इराणमधील युद्धावरून आंबेडकरांची टीका
आता अजित पवार आहेत, कुठे तर ते बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मग्न आहेत. माळेगाव सहकारी साखर कारखाना हा शरद पवार यांचा कारखाना म्हणून ओळखला जातो. पण, यंदाच्या निवडणुकीत अजित पवार यांनी पहिल्यांदाच कारखान्याच्या निवडणुकीत ब वर्गातून अर्ज दाखल करत मैदानात उतरले आहेत. त्यासह अजित पवार यांनी मीच कारखान्याच्या चेअरमन होणार असल्याचेही घोषित केले आहे. त्यामुळे अजित पवार हे दोन दिवसांपासून बारामतीत ठाण मांडून बसले आहेत.
यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनीही तिखट सवाल उपस्थित करत अजित पवार यांना टार्गेट केले आहेत. “अजित पवार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्याचा अजित पवारांना गर्व आणि अहंकारही आहे. मग, कुंडमळ्यातील दुर्घटनेची जबाबदारी अजित पवार हे पालकमंत्री म्हणून घेणार की घटकून टाकणार आहात का? अजित पवार यांनी स्थानिक आमदार सुनील शेळके यांच्या निवडणुकीत मोठा खर्च केला. परंतु, एक दोन कोटींचा पूल पालकमंत्री उभा करू शकले नाहीत. पालकमंत्री अशा लहान कामांत झोपलेले असतात आणि मोठ्या बिल्डरांचे काम, मेट्रोचे काम, मोठ्या ठेकेदारांच्या कामात पालकमंत्री जागे असतात,” अशी टीका संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर केली आहे.
हेही वाचा – Politics : आम्ही दोघेही मिळून काम करतोय; निवडणुकीसाठी पटोलेंची शिंदेंच्या शिलेदारासोबत हातमिळवणी
तर, दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समितीची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. पण, घटनेला जबाबदार कोण? बळींचे उत्तर कोण देणार? पुलाला मंजुरी दिली होती? मग कुठे काम रखडले? अजित पवार यांनी कुंडमळ्याला भेट का दिली नाही? अजित पवार यांना सहकारी साखर कारखान्याची निवडणूक महत्त्वाची आहे का? असे अनेक सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.