Rohit Pawar : मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर नव्यानं उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्यालगतची जमीन खचल्याची धक्कादायक घटना रविवारी समोर आली. पुतळ्याच्या डाव्या बाजूला मोठं भगदाड पडलं असून त्याठिकाणी जमीन खोलवर खचल्याचं समोर दिसतंय. सुदैवाने पुतळ्याला कसलाही धोका झालेला नाही. पुतळा भक्कम असून जमीन खचली आहे. त्यामुळे हे बांधकाम निकृष्ट दर्जाचं झाल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. यावरूनच पुन्हा एकदा राजकीय आरोप – प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यावरून महायुती सरकारवर टीका केली आहे. (Rohit Pawar on chhatrapati shivaji maharaj statue base platform land collapsed in malvan rajkot fort)
रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत महायुती सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. ते म्हणतात, निकृष्ट दर्जाच्या साहित्यामुळं मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता आणि आता नव्याने उभारलेल्या पुतळ्याला शंभर वर्षे काहीही होणार नाही असा दावा सरकारने केला. पण, पुतळ्याच्या अनावरणाला शंभर दिवसही झाले नसताना पुतळ्याच्या चबुतऱ्याचा भराव खचला. यावरून हे सरकार महापुरुषांचे पुतळे विचारांचा आदर्श आणि प्रेरणा म्हणून उभारतंय की केवळ ठेकेदारांसाठी, असा प्रश्न पडत असल्याचे रोहित पवार यांचे म्हणणे आहे. विचारांनाच खोली नसेल तर अशा सरकारकडून पुतळ्याच्या भक्कम पायाची अपेक्षा कशी करणार, असा सवाल ते उपस्थित करतात.
हेही वाचा – Karnatak Crime : बेपत्ता तरुणीचा सहा महिन्यांनी सापडला सांगाडा, प्रियकरानेच केला होता घात
आता यावर तात्पुरती डागडुजी केली जाईल पण महिन्याभरात भराव कसा खचला याचं उत्तर सरकारने द्यायला हवं, असं पवार यांनी म्हटलं आहे. भराव खचला म्हणजेच हे कामसुद्धा निकृष्ट दर्जाचं आहे, हे दिसतं आणि शिवप्रेमी म्हणून आम्ही हे कदापि खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. सरकारने याची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी पवारांनी केली आहे.
नौसेनादिनानिमित्त मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी करण्यात आली होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केल्यानंतर अवघ्या सहा महिन्यातच हा पुतळा कोसळला होता. त्यानंतर या घटनेची महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत सर्वांनीच गंभीर दखल घेत याच ठिकाणी नव्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य आणि अश्वारूढ असा नवा पुतळा उभारण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेतला. तसंच या पुतळ्याची संपूर्ण जबाबदारी प्रसिद्ध चित्रकार राम सुतार यांच्याकडे देण्यात आली होती. त्यांनी हा पुतळा अवघ्या सात ते आठ महिन्यातच उभा केला. अलीकडेच या पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पणही करण्यात आलं होतं. मात्र लोकार्पण करून अवघा महिना उलटत नाही, तोच पहिल्याच पावसात या पुतळ्याच्या चबुतर्यालगतची जमीन खचल्याची धक्कादायक घटना घडली आहे.