सोलापूर: सहकार वाढला पाहिजे, सहकारने अनेक पिढ्या घडवल्या आहेत. शेतकरी संपन्न केलाय, हे सगळं खरं असलं तरी सहकारमध्ये सुरु असलेले बेबंदशाही थांबवण्याची जबाबदारी सहकारमंत्री म्हणून बाबासाहेब पाटील तुमची आहे. डीसीसी बँक, राज्य बँकेचे उदाहरणं तुम्ही पाहा. एक प्रशासक बसला होता तर डीसीसी बँक व्यवस्थित चालयाला लागली, याचं आत्मपरीक्षन केलं पाहिजे. राज्य बँक जी हजारो कोटी तोट्यात होती, पण प्रशासक आला आणि ही राज्य बँक हजारो कोटीच्या नफ्यात आहे. याचं कधी तरी आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे.
सहकरामध्ये आपण पाहतो अनेकांचे कारखाने उभे राहिले, लोकांचे बँकाचे पैसे लागले. अनेक कारखाने सुंदर चालतात, पण कारखानदारी हे कुटुंब चालवण्याचे साधन म्हणून अलीकडे काहींनी बघितलं, त्यामुळे सहकार बदनाम झालाय, अशी बोचरी टीका ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी केली आहे. मंत्री जयकुमार गोरे यांच्या टीकेचा रोख पवार कुटुंबावर असून त्यांनी कुणाचे नाव न घेता ही टीका केल्याचे बोललं जात आहे.
सहकारात बाहेरच्या माणसाला सहज सामावून घेतलं जातं नाही, माझ्यासारख्या माणसाला अनेक जण म्हणतात बाकी काहीही कर पण कारखाना काढू नको. ज्यांचे कारखाने आहेत त्यांचे एकचे दोन, दोनचे चार झाले, पण आम्हाला कारखाना काढू नका म्हणतात. पण सहकारबद्दल मला मनापासून आदर आहे. कारण याने शेतकऱ्यांना अनेकांना ताकद देण्याचा कामं केलं. पण काही लोकांमुळे ही चळवळ बदनाम झालीय, या चळवळकडे लोक शंकेच्या नजरेने बघायला लागलेत. आता लोकांच्या मनातून ही शंका काढून टाकण्याची जबाबदारी बाबासाहेब या खात्याचा मंत्री म्हणून तुमच्यावर आली आहे, असेही मंत्री जयकुमार गोरे म्हणाले.
माझ्याकडे जी जबाबदारी आहे ती इमाने इतबारे पार पाडणारा मी माणूस आहे. जयकुमार गोरे हा शब्दाचा पक्का आहे, मी शब्द सहजासहजी देतं नाही आणि दिला तर कोणीहीमध्ये आलं तर ते सोडत नाही. माझ्याकडे कारखाना नाही, बँक नाही, माझा इतिहास नाही, भूगोल नाही. माझा इतिहास मीच लिहितोय. आई-वडिलांनी जन्म दिला आणि त्यापुढे इतिहास आपणच लिहितोय. फार चिंता करतं नाही, आपणच लिहू आपणच पुसू. माझ्या आयुष्यात प्रचंड संघर्ष राहिलाय, इथं पोहोचण्यासाठी असंख्य अडचणी आल्या. मी जरं एखाद्या संस्थानिकचा, खासदार आमदाराचा मुलगा असतो तर हा संघर्ष वाट्याला आला नसता. पण मी एका छोट्या शेतकऱ्याचा मुलगा आणि संघर्ष कोणासोबत तर थेट मोठ्यासोबत. पण या संघर्षाच्या छतीवर उभा राहून जयकुमार गोरे पुढे चाललाय, संस्थानिक साम्राज्य असताना 4 वेळा आमदार झालो.
अभिमन्यूला चक्रव्युव्हत जायचं माहिती होतं पण परत येता आलं नाही. पण मला माझ्या गुरूने मला सगळे चक्रव्युव्ह पार करायचं सगळे मार्ग सांगितले आहे. सोलापूरकरांनी मला प्रचंड प्रेम दिलं, मला आनंद आहे की विठुरायांच्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे, ज्या वारीमध्ये दर्शन घेताना पालखीपर्यंत पोहोचता यायचं नाही, पण याचं वारीच नियोजन करण्याची जबाबदारी परमेश्वराने मला दिली, असेही मंत्री जयकुमार गोरे म्हणाले.
सोलापूरकरांची मागणी होती सोलापूर-गोवा विमानसेवा सुरु करा, आत विमानसेवा सुरु झाली आहे. आता गोव्यासाठी विमानसेवा सुरु झाली तर काही जणांना वाटतं की गोव्यालाचं विमानसेवा का सुरु झाली? त्यांना वाटतं गोव्यात विमानसेवा झाली तर तस्करी होईल, आमची पिढी बिघडून येईल. गोव्याला गेल्यावर पिढी बिघडते हे कोणाला माहिती झालं? ते गोव्याला गेल्यावर बिघडून आले का? मला काही कोडं सुटलं नाही, गोवा आंतरराष्ट्रीय पर्यटण केंद्र आहे. गोव्यातून जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जाण्याची व्यवस्था होते. गोव्यातून सुरुवात झाली, पुणे मुंबई देखील सुरु होईल, असे म्हणत सोलापूर गोवा विमानसेवेवरून टीका करणाऱ्या प्रणिती शिंदेना देखील गोरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा