अंबरनाथ पालिका अंधारात
esakal June 18, 2025 01:45 AM

अंबरनाथ, ता. १७ (वार्ताहर) : अंबरनाथ नगरपालिकेच्या नव्या कोऱ्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरच्या एका दालनात अचानक पाणी साचल्याने पूर्ण दिवस वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे पालिकेच्या पहिल्या मजल्यावर सर्वत्र अंधार पसरल्याचे पाहायला मिळाले. विजच नसल्याने संगणक बंद पडले होते, शासकीय कामकाजही ठप्प झाले. दरम्यान, याची माहिती अधिकाऱ्यांना मिळताच तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम हाती घेण्यात आले. युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे.
अंबरनाथ नगरपालिकेच्या पहिल्या मजल्यावर उपमुख्याधिकारी यांचे दालन आहे. पूर्वी याच दालनातून उपमुख्याधिकारी उमेश राऊत यांचे कामकाज चालायचे; मात्र काही महिन्यांपूर्वीच त्यांचे हे दालन बदलण्यात आले. त्यामुळे अनेक महिन्यांपासून हे दालन बंद आहे. मात्र, मंगळवारी सकाळी या बंद दालनात अचानक पाणी साचल्याने पालिकेत गोंधळ उडाला. उपस्थित कर्मचाऱ्यांनी तत्काळ याची माहिती उपमुख्याधिकारी राऊत व शहर अभियंता राजेश तडवी यांना दिली. या ठिकाणची पाहणी करून पहिल्या मजल्यावरील वीजपुरवठा खंडित करण्यात आला. दालनात साचलेला पाण्याचा निचरा करण्यात आला आहे. पालिकेतील वीजपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. बंद दालनात शौचालयाच्या भिंतीलगतच्या वाहिनीमधून पाणी आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
हे पाणी शौचालयाच्या भिंतीतून दालनातील फरशीवर पसरल्याने विद्युत वाहिनीसाठी केलेल्या खड्ड्यात पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते. या खड्ड्यात अनेक वाहिन्यांचा गुथा असल्याने शॉर्टसर्किट होऊ नये, यासाठी मजल्यावरील वीजपुरवठा खंडित करण्यात आला. पुढील दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. याचा सर्व परिणाम पालिकेच्या कामकाजावर झालेला आहे. पूर्ण दिवस वीजच नसल्याने पहिल्या मजल्यावरचे सर्व संगणक बंद पडलेले होते. शासकीय कामकाजही ठप्प झाले होते. एकच वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या मजल्याच्या या दालनात पाणी कसे साचले? असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत.

संबंधित विद्युत विभागाला याप्रकरणी सूचना दिल्या आहेत. युद्ध पातळीवर काम सुरू करण्यात आले. लवकरच पहिल्या मजल्यावरचा वीजपुरवठा सुरळीत केला जाईल.
- किमया पवार, जनसंपर्क अधिकारी

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.