हरित क्रांतीच्या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण
रोहा (बातमीदार) ः पर्यावरण रक्षणार्थ एक पाऊल पुढे टाकत धाटाव येथील सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या वतीने सामाजिक दायित्व विभागाच्या माध्यमातून खांब ग्रामपंचायत आणि गोवे गावात हरित क्रांतीचा अभिनव उपक्रम राबवून वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी गोवे व खांब ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच सुदर्शन केमिकलचे पर्यावरण विभागाचे विक्रम वाबळे व त्यांचे सहकारी, संतोष मुंढवे, गणेश बांभुरकर, रवी दिघे, महेश डेरिया, स्वाती मोहिते व अमर चांदणे आदी उपस्थित होते. सीएसआर विभागप्रमुख माधुरी सणस यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेला उपक्रम म्हणजे पर्यावरणाच्या संरक्षणाबरोबरच समाजाच्या भावनिकतेला जोडण्याचा अनोखा प्रयत्न आहे. कंपनीचे महेश डेरिया यांनी, ही झाडे गावातील पुढील पिढ्यांसाठी एक हिरवी विरासत असेल, असे सांगितले.
रोहा ः गोवे गावात वृक्षारोपण करण्यात आले.
---------------------
अडीच हजार कलमी आंब्याच्या रोपांचे वाटप
पेण (वार्ताहर) : तालुक्यातील बोरगाव ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये पर्यावरण संवर्धनाकरिता आणि आदिवासीबांधवांच्या रोजगार वृद्धीसाठी टीसीएसआरडी मिठापूर, रॅलीज इंडिया आणि ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आदिवासी कुटुंबांना जवळपास अडीच हजार कलमी आंब्याच्या रोपांचे वाटप करण्यात आले. तांबडी, उंबरमाळ, खवसावाडी, काजूवाडी आणि केळीची वाडी येथील १४६ आदिवासी कुटुंबांना कलमी आंब्याची रोपे वाटप करण्यात आल्याने येथील बांधवांच्या रोजगाराच्या दृष्टिकोनातून त्यांना हातभार लागणार आहे. विशेष म्हणजे, येथील वाड्यांमध्ये पाण्याचे मोठ्या प्रमाणात दुर्भिक्ष असतानाही आदिवासीबांधवांनी याआधी लावलेल्या झाडांचे संगोपन योग्यरीत्या करीत आहेत. त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून दोन वर्षांत लावलेली झाडे जगण्याचे प्रमाण सरासरी ९० टक्के आहे.
------
नवागतांच्या स्वागतासाठी पहिले पाऊल उपक्रम
अलिबाग (वार्ताहर)ः वेश्वी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सोमवारी (ता. १६) प्रवेशोत्सव आणि नवगतांच्या स्वागतासाठी शाळेतील ‘पहिले पाऊल’ हा उपक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल उपस्थित होत्या. याबरोबर वेश्वीचे सरपंच गणेश गावडे, उपसपंच आरती पाटील, सदस्य रसिका मगर, मृदुला मगर, चैताली गुरव, जुई शेळके, उद्धव भितळे आदी उपस्थित होते. आपल्या मुलाला उत्तम शिक्षण मिळावे, यासाठी प्रत्येक पालक प्रयत्न करीत असतो. शिक्षणाच्या बाबतीत पालकांनी जागरूक होऊन आपल्या मुलाला जिल्हा परिषदेच्या शाळेत उत्तम शिक्षण कसे मिळून देता येईल, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. वेळोवेळी शिक्षकांची भेट घेऊन आपल्या पाल्याची शैक्षणिक क्षमता जाणून घेत त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक आचल दलाल यांनी सांगितले. पहिलीत प्रवेश करणाऱ्या सहा विद्यार्थ्यांना शाळेच्या उंबरठ्यात उभे करून कुंकवाच्या पावलांचे ठसे कागदावर घेत अनोखे स्वागत करण्यात आले. नव्याने पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेबद्दल आकर्षण निर्माण होण्यासाठी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व खाऊ देऊन शिक्षण विभागाच्या वतीने स्वागत केले. त्यानंतर शाळेच्या वतीने संपूर्ण गावांमध्ये रॅली काढण्यात आली.
--------
पटसंख्या रोखण्यासाठी जिल्हा परिषदेतील शिक्षकाचा आदर्श
माणगाव (वार्ताहर) ः पटसंख्येअभावी जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होत असताना माणगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षक दत्ताराम शिर्के यांनी आपल्या मुलाला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विकास कॉलनी शाळेत इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतला. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनीही आपल्या पाल्यास जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल करून घ्यावे, असा आदर्श घालून दिला आहे. दत्ताराम शिर्के व त्यांच्या पत्नी सरकारी नोकरीत असून आपला पाल्यानेही सरकारी शाळेत शिक्षण घेतले पाहिजे, या हेतूने प्रेरित होऊन त्यांचा मुलगा चित्रांशला जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल केले. त्यांचा मोठा मुलगा प्रबोधही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून यंदा दहावीच्या परीक्षेत ९८.२० गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे. इतर सरकारी कर्मचाऱ्यांनी याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या पाल्याला सरकारी शाळेत दाखल करून जिल्हा परिषदेच्या शाळेतील घटणारी पटसंख्या थांबवावी, अशी अपेक्षा या वेळी शिर्के यांनी व्यक्त केली.
-------------