उ. सोलापूर : बाजारात लिंबाचे दर इतके घसरले की विक्री अभावी लिंबू कचऱ्यात फेकण्याची वेळ आली आहे. उच्च प्रतीच्या लिंबांना प्रति किलो अवघा दहा ते बारा रुपये इतका भाव मिळत आहे. लिंबू दर कोसळण्याचा फटका शेतकऱ्याबरोबरच व्यापाऱ्यांनाही बसला आहे. किरकोळ बाजारातही एक रुपयांना दोन लिंबू मिळत आहेत.
पूर्व मोसमी पावसामुळे लिंबूचे संपूर्ण गणित बिघडले आहे. दुय्यम प्रतीचा लिंबू ग्राहकाअभावी कचऱ्यात फेकण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे. उन्हाळ्यात सोन्याच्या दरात विकणारा लिंबू आज मातीमोल होत आहे. सध्याच्या दरात शेतकऱ्यांना उत्पादन खर्च काढणी खर्च सोडा वाहतूक खर्चही हातात पडत नसल्याची माहिती समोर येत आहे. मे महिन्यातच भरपूर पाऊस पडल्यामुळे उशिरा येणारा लिंबू लवकरच बाजारात दाखल झाला. त्याचबरोबर मुबलक पाणी मिळाल्यामुळे लिंबूच्या आकारात फार मोठा बदल झाला. उत्तर भारतातील महानगरांमध्ये सोलापूर परिसरातून लिंबूची निर्यात होत होती. त्या ठिकाणीही पाऊस पडत असल्यामुळे लिंबू मागणी फारच रोडावली आहे. गेल्या आठवड्यापासून कित्येक व्यापाऱ्यांना खरेदी खर्चापेक्षाही कमी रक्कम विक्रीतून मिळाल्याचा दावा केला आहे.
सोलापूर बाजार समिती व परिसरातील बाजारातून आग्रा, जयपूर, इंदोर यासारख्या महानगरामध्ये लिंबू निर्यात होतो. मात्र दहा पंधरा दिवसांपासून या परिसरात पाऊस सुरू झाल्यामुळे मागणी ठप्प झाली आहे. या उलट बाजारात लिंबूची आवक फार मोठी वाढली यामुळे उत्पादकासह व्यापाऱ्यांच्याही फार मोठे नुकसान होत आहे.
- रफिक नदाफ, व्यापारी.
१६६ क्विंटलची आवकमंगळवारी (ता. १७) सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात १६६ क्विंटल लिंबू आवक झाल्याची नोंद आहे. या लिंबूला प्रति किलो ५रुपये ते १४ रुपये इतका दर मिळाला आहे. एका किलोमध्ये उच्च प्रतीचे जवळपास ३० लिंबू बसतात तर दुय्यम प्रतीचे ५० ते ६०.