ENG vs IND : 67 सामने-19 मालिका, टीम इंडियाची इंग्लंडमधील कामगिरी कशी? गिल-गंभीर 18 वर्षांची प्रतिक्षा संपवणार?
GH News June 19, 2025 04:10 PM

टीम इंडियासाठी इंग्लंड दौरा कायमच आव्हानात्मक राहिला आहे. इंग्लंडच्या वेगवान आणि फिरकी गोलंदाजांसमोर टीम इंडियाच्या फलंदाजांना अग्निपरीक्षा द्यावी लागली आहे. भारताच्या फलंदाजांना यंदाही या आव्हानाचा सामना कारयचा आहे. टीम इंडियाने 1932 साली पहिल्यांदा इंग्लंड दौरा केला होता. तेव्हापासून ते गेल्या इंग्लंड दौऱ्यापर्यंत टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवण्यासह अनेक विक्रमही केले आहेत. टीम इंडियाच्या यंदाच्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात 20 जूनपासून होत आहे. टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामने खेळणार आहे. टीम इंडिया शुबमन गिल याच्या नेतृत्वात आणि हेड कोच गौतम गंभीर याच्या मार्गदर्शनात इंग्लंड विरुद्ध 2 हात करणार आहे. गंभीर-गिल या जोडीला गेल्या 18 वर्षांमध्ये इतर भारतीय कर्णधार आणि प्रशिक्षकांना जे जमलं नाही, ते करुन दाखवण्याची संधी आहे.

टीम इंडियाला इंग्लंड विरुद्ध त्यांच्याच घरात कसोटी मालिका जिंकण्यासाठी फार संघर्ष करावा लागला आहे. टीम इंडियाने इंग्लंडमध्ये 18 वर्षांपूर्वी शेवटची कसोटी मालिका जिंकली होती. राहुल द्रविड याने 2007 साली टीम इंडियाला कसोटी मालिका जिंकून दिली होती. तेव्हापासून टीम इंडियाची प्रतिक्षा कायम आहे. त्यामुळे टीम इंडिया 2007 नंतर यंदा टेस्ट सीरिज जिंकणार का? हा प्रश्न चाहत्यांसमोर आहे. मात्र टीम इंडिया मालिका जिंकू शकते का? यासाठी टीम इंडियाचा इंग्लंडमध्ये टेस्ट क्रिकेटमधील 1932 पासूनचा इतिहास जाणून घेऊयात.

टीम इंडियाची इंग्लंडमधील कामगिरी

टीम इंडियाने जवळपास 93 वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये पहिला कसोटी सामना खेळला होता. इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यात 25 जून 1932 रोजी हा कसोटी सामना खेळवण्यात आला होता. हा सामना लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये खेळवण्यात आला होता. तेव्हापासून टीम इंडियाने इथे 67 सामने खेळले आहेत. त्यापैकी फक्त 9 सामनेच जिंकता आले आहेत. भारताला 38 वेळा पराभूत व्हावं लागलं. तर 20 सामने बरोबरीत राहिले. त्यामुळे इंग्लंडमध्ये जिंकणं किती आव्हानात्मक आहे, हे आकडेवारीवरुन स्पष्ट होतं.

टीम इंडियाने आतापर्यंत इंग्लंडमध्ये एकूण 19 मालिका खेळल्या आहेत. टीम इंडियाला त्यापैकी फक्त 3 मालिकांमध्येच विजयी होता आलं आहे. टीम इंडियाने इंग्लंडमध्ये पहिल्यांदा 1971 साली अजित वाडेकर यांच्या नेतृत्वात 1-0 अशा फरकाने कसोटी मालिका जिंकली होती.

त्यानंतर कपिल देव यांनी 1986 साली भारताला मालिका जिंकून दिली. देव यांच्या नेतृत्वात भारताने इंग्लंडचा त्यांच्याच घरात 2-0 अशा फरकाने धुव्वा उडवला. तर टीम इंडियाने तिसरी आणि शेवटची मालिका ही 2007 साली जिंकली. टीम इंडियाने 2 सामन्यांची मालिका 1-0 अशा फरकाने आपल्या नावावर केली. तर टीम इंडिया 2021 साली इंग्लंडमध्ये 2-2 अशा फरकाने मालिका बरोबरीत सोडवण्यात यशस्वी ठरली.

इंग्लंडमधील यशस्वी भारतीय फलंदाज आणि गोलंदाज

इंग्लंडमध्ये टीम इंडियासाठी कसोटीत सर्वाधिक धावांचा विक्रम सचिन तेंडुलकर याच्या नावावर कायम आहे. सचिनने इंग्लंडमध्ये 23 कसोटी सामन्यांमध्ये 51 च्या सरासरीने 1 हजार 571 रन्स धावा केल्या आहेत. सचिनने इंग्लंडमध्ये 4 शतकं झळकावली आहेत. तसेच राहुल द्रविडनेही 4 वेळा शतक ठोकलं होतं. इंग्लंडमध्ये सौरव गांगुली याने टीम इंडियाकडून एका डावात सर्वाधिक 193 धावा केल्या.

इंग्लंडमध्ये भारताकडून कपिल देव यांनी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. देव यांनी 21 कसोटी सामन्यांमध्ये 31.05 च्या सरासरीने 85 विकेट्स मिळवल्या आहेत. तसेच एका डावात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम इशांत शर्मा याच्या नावावर आहे. इशांतने 2014 साली 74 धावांच्या मोबदल्यात 7 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला होता. इंग्लंडमध्ये अनिल कुंबळे आणि कपिल देव या दोघांनी 4 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत.

टीम इंडियाची युवा ब्रिगेड किती सक्षम?

आतापर्यंत आपण टीम इंडियाचा इंग्लंडमधील कसोटीतील इतिहास पाहिला. मात्र आता इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या युवा टीम इंडिया किती सक्षम आहे? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आर अश्विन, रोहित शर्मा आणि विराट कोहली या तिघांच्या निवृत्तीमुळे टीम इंडियातील युवा खेळाडूंवर जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे युवा खेळाडूंचा या मालिकेत चांगलाच कस लागणार आहे. युवा खेळाडूंकडे या दौऱ्यात शानदार कामगिरी करुन संघातील आपली जागा निश्चित करण्याची संधी आहे. त्यामुळे या दौऱ्यात कोण चमकणार आणि कोण ढेर होणार? हे या मालिकेनंतरच स्पष्ट होईल.

शुबमन गिल याची इंग्लंडमधील सरासरी ही 35 इतकी आहे. जसप्रीत बुमराह याने इंग्लंडमध्ये 24.50 च्या सरासरीने 64 विकेट्स घेतल्या आहेत. यशस्वी जयस्वाल याने 2021 साली इंग्लंड दौऱ्यात एकूण 320 रन्स केल्या होत्या. तसेच शार्दूल ठाकुर याने इन्ट्रा स्क्वॉड मॅचमध्ये 122 आणि 4 अशा धावा केल्या. त्यामुळे ऑलराउंडर म्हणून शार्दुलवर या मालिकेत मोठी जबाबदारी असणार आहे.

गिल-गंभीर 18 वर्षांची प्रतिक्षा संपवणार?

जेम्स अँडरसन आणि स्टूअर्ट ब्रॉड या दोघांनी निवृत्ती घेतली असली तरी टीम इंडियाच्या फलंजाजांना इंग्लंडमधील आव्हानात्मक खेळपट्टीवर सामना करायचा आहे, ही सत्य परिस्थिती आहे. इंग्लंडमधील स्विंग आणि सीम गोलंदाजांसाठी पोषक आहे. त्यामुळे टीम इंडियासमोर सीम आणि स्विंग विरुद्ध यशस्वीपणे खेळण्याचं आव्हान असणार आहे. मात्र टीम इंडियात सध्या नव्या दमाचे आणि जशास तसं उत्तर देणारे शिलेदार आहेत. टीम इंडियाने 4 वर्षांपूर्वी 32 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाचा गाबात माज उतरवला होता. त्यामुळे यंदाही टीम इंडियाने तशीच कामगिरी करावी आणि 2007 नंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकावी, अशी आशी भारतीय चाहत्यांना आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.