शहादा- शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात वादळामुळे खंडित झालेला वीजपुरवठा तत्काळ सुरू करण्यासह पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणा, शेतकऱ्यांना मुबलक व नियमित वीजपुरवठा करावा, अशा सूचना आमदार राजेश पाडवी यांनी वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
शहर व तालुक्यात ग्रामीण भागात गेल्या आठवड्यात झालेल्या वादळी व मुसळधार पावसामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीजतारा तुटल्या असून, खांब पडल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार राजेश पाडवी यांनी शहादा येथील वीजवितरण कंपनीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.
या बैठकीत वीजपुरवठा लवकरात लवकर कसा सुरू करण्यात येईल, यासाठी वीजकंपनीचे नियोजन काय, त्यांच्या अडचणी व शासनाकडून त्यांना कशा प्रकारचे सहकार्य हवे, याबाबत चर्चा करण्यात आली. तालुक्यातील म्हसावद, मंदाना, शहादा व तिखोरा या भागात मोठ्या प्रमाणात समस्या असल्याने यावर चर्चा झाली. या वेळी वीजवितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता युगलकिशोर केशव प्रसाद, उपकार्यकारी अभियंता तिरुपती पाटील, पुष्पेन्द्र पाडवी, वरिष्ठ व कनिष्ठ अभियंता, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील, विनोद जैन, शहराध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी, स्वीय सहायक हेमराज पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
उपाययोजना कराव्यात
गेल्या काही महिन्यांपासून शहादा शहरात वीजपुरवठ्याबाबत अनेक तक्रारी असून, वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. नियमित वीजपुरवठा करण्यासाठी वीज कंपनीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी स्वतंत्र फिडर कार्यान्वित करावे. ज्यामुळे शेती व शहरातील विजेचा भार हा दुभागला जाईल.
नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा होईल. राज्य शासनाने वीज कंपनीला अनेक रोहित्र व खांब उपलब्ध करून दिले आहेत. ग्रामीण भागात स्वतंत्र सबस्टेशन मंजूर केले आहेत. या सर्वांचे काम त्वरित करण्यात येऊन कार्यान्वित करण्यात यावे, अशा सूचना आमदार पाडवी यांनी दिल्या.
अपुरे मनुष्यबळ
अपुरे मनुष्यबळ असल्याने तक्रारी सोडविण्यासाठी अडचणी निर्माण होतात. शासनाने मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, याबाबत वरिष्ठ कार्यालयाला अहवाल सादर करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर आमदार पाडवी यांनी तत्काळ वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा केली.