भारतीय वाङ््मय, भारतीय शास्त्रे, भारतीय तत्त्वज्ञान ही काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेले दिसतात. यांचा उगम भारतात झाला असला तरी त्यांचा उपयोग, संपूर्ण जगात झालेला दिसतो. योग आणि आयुर्वेद या दोन्ही शास्त्रांच्या बाबतीत हा अनुभव येतो. योगाचा प्रसार, प्रचार आज संपूर्ण जगात झालेला आहे.
विशेषतः युरोपियन आणि अमेरिकन देशांमध्ये अगदी घराघरांत, विशेषतः तरुण मंडळींमध्ये ‘योगा’ करण्याची आवड रुजलेली दिसते. भारत सरकारच्या पुढाकाराने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याची पद्धत सुरू झाली.
योग म्हणजे जोडणे. कशाशी, कुणाला, काय जोडायचे आहे? मनुष्यात असलेले मनुष्यत्व किंवा मूळ संवेदना यांच्याशी शरीराला जोडणे अभिप्रेत असते. दोन्ही बाजूला संबंध असलेल्या मनाचा उपयोग करून एकरूपता अनुभवणे व जीवनाचा आनंद घेत घेत आपल्या लक्ष्यापर्यंत, समाधानापर्यंत, समृद्धीपर्यंत पोहोचणे हा मूळ हेतू. हे ध्येय आता योगामुळे साध्य होईल असे वाटू लागलेले आहे.
जडाचे शक्तीत व शक्तीचे जडात रूपांतर होत असताना आणि दोन वस्तू जोडत असताना आवश्यकता असते अग्नीची. भौतिक पातळीवर अग्नी विशेष कार्य करतो. शरीरात जाठराग्नी, वैश्र्वानर अग्नी वगैरे अग्नीची विविध रूपे दिसतात, ज्यांचे आधुनिक शास्त्रातील हॉर्मोन्सशी साधर्म्य दाखवता येईल.
म्हणून योगशास्त्राचा अवलंब केला असता संप्रेरकांच्या असंतुलनामुळे आलेले दोष कमी होतात आणि मनुष्याला कर्म करताना वेगवेगळ्या कल्पना अंतर्भूत करण्यासाठी आतून मार्गदर्शन मिळते. म्हणूनच असे म्हणतात की सूर्य हा बाहेरचा अग्नी शरीराला आरोग्य देतो आणि शरीरस्थ अग्नी मनुष्याला धन, समृद्धी, विकास या गोष्टी प्रदान करतो.
‘आरोग्यं भास्करात् इच्छेत् धनमिच्छेत् हुताशनात्’ या श्र्लोकात हेच सांगितलेले आहे. या दृष्टीने एकूण मनुष्यमात्राचा विकास आणि सर्व विश्र्वाला एकत्र जोडून विश्र्वबंधुत्वाचा (सध्याच्या भाषेत ग्लोबलायझेशनचा) अनुभव घेण्यासाठी योगशास्त्राचा उपयोग होईल. योगाच्या आठ अंगांमध्ये आसन-प्राणायाम ही दोन अंगे आहेत.
अर्थात, जीवन जगताना यम-नियम, प्रत्याहार-ध्यान, धारणा-ध्यान यांचा वापर करावाच लागतो. भ्रष्टाचारमुक्त, अत्याचारमुक्त, नैतिकयुक्त व प्रेमाने जीवन जगण्यासाठीची प्रेरणा योगातून घेऊन त्याप्रमाणे योगाच्या सर्व अंगांचा अभ्यास करत मनुष्याला विकास साधता येऊ शकतो.
यत्र योगेश्र्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः।
तत्र श्रीर्विजयो भूतिर्धुवा नीतिर्मतिर्मम॥
श्रीमद््भगवद््गीता १८व्या अध्यायात हा श्र्लोक सांगून थांबते. ज्या ठिकाणी योगेश्र्वर भगवान श्रीकृष्ण आहेत व ज्या ठिकाणी गांडीव धनुष्यधारी अर्जुन आहे त्या ठिकाणी सर्व मांगल्य व विजय व संपूर्ण सत्य याचे वास्तव्य असते, अशी दृढ श्रद्धा आहे. धर्मक्षेत्रावर सुरू झालेले हे महायुद्ध की ज्यात अव्याहतपणे व सृष्टीचा नियम म्हणून कर्म करावेच लागते.
आणि ते कर्म निसर्गधर्माने व्हायला हवे असते तरच शेवटी अशा तऱ्हेचा विजय मिळतो. असे गीतेचे, पर्यायाने ज्ञानेश्र्वरीचे, महाभागवताचे, महाभारताचे व जेवढे म्हणून अध्यात्मिक जीवनाभिमुख ग्रंथांचे हे सार आहे. येथे कृष्णांसाठी ‘योगेश्र्वर’ हे विशेषण वापरले आहे ते अशा दृष्टीने की जीवनाचा मंगल योग जिवाला मनुष्यजन्म मिळून लाभतो, त्यात योगमार्गाचा अवलंब करून मनुष्य स्वतःच्या लक्ष्यापर्यंत पोचू शकेल.
योगाचा मूळ अर्थ जोडणे अभिप्रेत आहे. शरीर व प्राण, शरीर व मन, मन व आत्मा, आत्मा व परमात्मा यांचे मीलन करण्याचा जो मार्ग तो हा ‘योग’.
या श्र्लोकात वापरलेली सर्व नावे अत्यंत समर्पक आहेत ज्यामुळे आपल्याला बरेच काही कळू शकते. या ठिकाणी अर्जुनाला ‘पार्थ’ म्हणून संबोधले आहे. पार्थ म्हणजे जो पलीकडचे पाहतो, पलीकडे जाऊन पुन्हा सुरुवात करतो, म्हणजेच जो थांबत नाही.
एका बाजूला जड दुसऱ्या बाजूला चैतन्य, मध्ये असणाऱ्या जीवनसरितेच्या पार होऊन जो सतत कार्यरत राहतो तो पार्थ. जगण्यातून शांती मिळवण्याची इच्छा असणाऱ्यांनी कोणत्या गुणांचा अवलंब करावा हा बोध आपल्याला ज्याच्यापासून होतो तो पार्थ.
अर्जुन ‘धनुर्धर’ही आहे म्हणजे त्याने धनु धारण केलेले आहे. हे धनु कुठले व ते कुठून आलेले आहे याचा विचार केल्यास लक्षात येते की सोमाने हे धनु वरुणाला दिले होते, वरुणाने पुढे अग्नीला दिले आणि पुढे अग्नीने अर्जुनाला दिले. अशी ही कथा धनुष्याची, धनुर्धारी मानवाची.
मेरुदंड म्हणजे आपल्या मेंदूतून निघालेला वाढीव निमुळता भाग आहे. मेंदूत असलेल्या सोमरसाची देवता आहे सोम (चंद्र). एका बाजूने चंद्र मनाचा कारक आहे तर दुसऱ्या बाजूने सोम ही सर्व देवतांना शक्ती देणाऱ्या रसायनाची-सोमरसाची देवता आहो. या सोमाने धनुष्य पृथ्वीकडे सरकवले आणि त्याच्या मार्गावर अनेक अग्नीची स्थाने निर्माण केली. ज्या ग्रंथीतून होणाऱ्या स्रावावर संपूर्ण शरीरव्यापार चालतो. अग्नीच्या ताब्यात धनुष्य आल्यानंतर ते पुढे अर्जुनाला मिळाले व तो धनुर्धर झाला. म्हणजे पार्थासारखे वागणे असणाऱ्याच्या ताब्यात धनुष्य राहते व आणि तो धनुर्धर होतो. धनुर्धर म्हणजे धनुष्य पाठीवर अडकवून नुसतेच ओझे बाळगायचे नसते. कृष्ण व धनुर्धर यांचा योग झाल्यास त्या ठिकाणी विजय असतो, श्री असते असे सांगितले.
योग म्हणजे काय? धनुष्याला प्रत्यंचा जोडून सोडलेला बाण जसा आपल्या लक्ष्यापर्यंत जातो, तसे धनुष्यातून जेव्हा शक्ती उत्सर्जित करण्याची कल्पना असते त्यावेळी प्राणायाम, कपालभाती किंवा भस्रिका वा अनेकविध क्रिया करणे अपेक्षित आहे. भगवद्गीतेत सांगितले आहे की मूलाधारबंघ व जालंधरबंध करून जर षण्मुखी मुद्रा करून त्यात ॐकार उच्चारून ऐकला तर आपल्या लक्ष्यापर्यंत पोचणे सोपे होते.
म्हणून अग्नित्राटक, षण्मुखी मुद्रा व ॐकार गूंजन करण्याने आपल्या लक्ष्यापर्यंत जाता येते. या तिन्ही गोष्टींची पूर्वतयारी म्हणून कपालभाती, भस्रिका व प्राणायाम वगैरेंची गरज असते. हे सर्व नीट होण्यासाठी करावी लागतात आसने व आसनात स्वस्थ बसता यावे या दृष्टीने स्वीकारलेले असतात यम-नियम किंवा प्रत्याहार-धारणा-ध्यान.
(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित.)