संगमेश्वरातील वाहतूक कोंडी होणार दूर
अनंत पवार ः महामार्गावर कायस्वरुपी दोन पोलिस नियुक्त, उड्डाणपुलाच्या कामामुळे गैरसोय
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २० : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर येथे होणारी वाहतूककोंडी सोडवण्यासाठी दोन कायमस्वरूपी वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग वाहतूक पोलिस शाखेचे उपनिरीक्षक अनंत पवार यांनी दिली.
महामार्गाचे आरवली ते हातखंबा (रत्नागिरी) दरम्यान चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. संगमेश्वर बसस्थानकासमोरील नदीवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या ठिकाणचा जुना रस्ता अरूंद आहे. या रस्त्यावरून वाहने ये-जा करत असताना वाहतूककोंडी होते. सुटीच्या हंगामात वाहतूककोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावतो. येथील वाहतूककोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी संगमेश्वर पोलिस ठाण्याचे काही कर्मचारी येथे तैनात असतात; मात्र त्यांची संख्या अपुरी पडते. त्यामुळे आता राष्ट्रीय महामार्ग विभागाने त्यांचे दोन कर्मचारी येथे कायमस्वरूपी देण्याचा निर्णय घेतला आहे, असे पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, मुसळधार पावसात महामार्गावर दरड कोसळणे, झाडे पडणे, रस्ता निसरडा होणे, खड्डे पडणे आदी समस्या उद्भवतात. परिणामी, अपघाताच्या घटना घडून जीवितहानी होते. हे रोखण्याचे आव्हान जसे संबंधित यंत्रणांपुढे आहे तसे राष्ट्रीय महामार्ग पोलिस विभागासमोरही आहे. आमचे २३ कर्मचारी वाहनचालकांना वाहने चालवताना विशेष काळजी घेण्याच्या सूचना करतात.
चौकट
सूचना व उपाययोजना
* महामार्गावर आपत्ती व्यवस्थापनासाठी रुग्णवाहिका, जेसीबी, हायड्रा ब्रेन, पुरेसे कर्मचारीवर्ग आदींची व्यवस्था २४ तास उपलब्ध.
* आवश्यक ठिकाणी साईडपट्टी, पॅटआईज, पॅनकॉर मिरर, वेगमर्यादा दर्शवणारे फलक तसेच वाहतूक वळवलेल्या ठिकाणी सूचनाफलक लावण्यात आले आहेत.
* ऑईल गळतीवर उपाययोजना म्हणून वाळू ठेवण्यात आली आहे.
* महामार्गालगत असलेल्या नाल्यांची सफाई
* वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे, नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई