पुणे, ता. २० : ‘‘जंगले जपण्यात महिलांचा फार पूर्वीपासून मोलाचा वाटा आहे. अनेक देवराई या देवींच्या नावाने सुरक्षित ठेवल्याचे आढळून आले आहे,’’ असे प्रतिपादन वनस्पतितज्ज्ञ डॉ. श्रीनाथ कवडे यांनी केले.
‘तनिष्का व्यासपीठा’च्या वतीने ‘चला देवराई जपू’ याविषयी आयोजित विशेष वेबिनारमध्ये ते बोलत होते. याप्रसंगी राज्यभरातून मोठ्या संख्येने तनिष्का सदस्या सहभागी झाल्या होत्या. महिलांमध्ये क्षमतांचा आणि कौशल्यांचा विकास व्हावा, या उद्देशाने दर महिन्याला असे वेबिनार आयोजित केले जातात.
डॉ. कवडे म्हणाले, ‘‘हिमाचल प्रदेश, केरळ आणि महाराष्ट्रात देवराई मोठ्या संख्येने आढळतात. आपल्याकडे शेकडो वर्षांपासून निसर्गाला देव मानण्याची परंपरा आहे. देवासाठी जंगल राखीव ठेवले म्हणून त्याला देवराई असे संबोधण्यात येते. अनेक देवराई या देवींच्या नावाने सुरक्षित ठेवलेल्या आहेत. त्यामुळे जंगल जपण्याची परंपरा ही स्त्री केंद्रित असल्याचे समोर आले आहे. निसर्गातील जैवविविधतेची साखळी जिवंत ठेवण्याचे काम देवराई करत आहेत. महाराष्ट्रातील अनेक देवराईंमध्ये अत्यंत दुर्मीळ वनस्पती, पक्षी आणि कीटकांचा अधिवास आढळून आलेला आहे. परंतु लोकसंख्या वाढ, गावातील वाढलेली वर्दळ, शेती, विकास यामुळे देवराईंची संख्या कमी होत आहे. त्यामुळे निसर्गाला धक्का पोहोचत आहे.’’ याप्रसंगी तनिष्का सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. कवडे यांनी सविस्तर उत्तरे दिली.