सासवड, ता. २० : सासवड (ता. पुरंदर) शहरातील वढणेवस्ती ते जयदीप मंगल कार्यालय हा रस्ता एका ठिकाणी खचल्याने परिसरातील नागरिक आणि वाहनचालकांसाठी धोका निर्माण झाला आहे.
या मार्गावरून दररोज शेकडो नागरिक, तसेच परिसरातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमधील रहिवासी ये- जा करत असतात. रस्त्याच्या या दुरवस्थेमुळे चारचाकी आणि मोठ्या वाहनांनी या मार्गावरून प्रवास टाळावा, असे आवाहन स्थानिक रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते तानाजी सातव यांनी केले आहे.
येत्या रविवारी (ता. २३) संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सासवडमध्ये दोन दिवसांच्या मुक्कामासाठी येत आहे. या सोहळ्यात हजारो वारकरी या मार्गावरून ये- जा करणार असल्याने, कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी तानाजी सातव आणि परिसरातील रहिवाशांनी प्रशासनाकडे केली आहे. रस्ता खचल्याने दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांसाठीही धोका निर्माण झाला आहे. विशेषतः पावसाळा सुरू असल्याने ही समस्या अधिक गंभीर झाली आहे. पालखी सोहळ्यापूर्वी या रस्त्याची तत्काळ दुरुस्तीची मागणी सातव आणि परिसरातील रहिवाशांनी केली आहे.