वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेतील पहिला सामना श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात पार पडला. पाच दिवसांचा खेळ संपल्यानंतरही या सामन्याचा काही निकाल लागला नाही. त्यामुळे सरते शेवटी हा सामना ड्रॉ झाला. नाणेफेकीचा कौल जिंकून बांगलादेशने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशने पहिल्या डावात 495 धावांची खेळी केली. दोन दिवस बांगलादेशने फलंदाजी केली. तसेच तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी श्रीलंकेने आक्रमक फलंदाजी करत 485 धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या डावात बांगलादेशकडे 10 धावांची आघाडी होती. या आघाडीसह पुढे खेळताना बांगलादेशने 6 गडी गमवून 285 धावा केल्या आणि डाव घोषित केला. श्रीलंकेसमोर विजयासाठी 295 धावांचं आव्हान दिलं. पाचव्या दिवशी शेवटच्या दोन सत्रात हे आव्हान गाठणं काही सोपं नव्हतं. श्रीलंकेने 4 गडी गमवून 74 धावा केल्या आणि हा सामना ड्रॉ झाला. हा सामना ड्रॉ झाल्याने गुणतालिकेत काय फरक पडला ते जाणून घ्या.
श्रीलंका आणि बांग्लादेश सामना ड्रॉ झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी 4 गुण मिळाले आहेत. तसेच दोन्ही संघांची विजयी टक्केवारी ही 33.33 टक्के इतकी आहे. पुढच्या दोन वर्षात या गुणतालिकेत मोठी उलथापालथ होणार हे नक्की आहे. पण बांग्लादेशसारख्या दुबळ्या संघाने श्रीलंकेला पहिल्या कसोटी झुंजवल्याने श्रीलंकेचं अंतिम फेरीचं गणित किचकट होत जाणार आहे. बांग्लादेश आणि श्रीलंका यांच्यातील शेवटचा कसोटी सामना 25 जूनपासून सुरु होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघ कशी कामगिरी करतात याकडे लक्ष लागून असेल. श्रीलंका एकूण 12 कसोटी सामने खेळणार आहे. त्यापैकी एक ड्रॉ झाला आहे. त्यामुळे विजयी टक्केवारीवर परिणाम होणार आहे.
श्रीलंकेचा कर्णधार धनंजय डीसिल्वा म्हणाला की, ‘पहिल्या डावात आम्ही ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, त्यामुळे आम्ही खूप जास्त धावा दिल्या. त्यांनी त्यांचे सर्वोत्तम प्रयत्न केले. शांतो आणि मुशी यांनी खरोखरच चांगली फलंदाजी केली, त्यांनी आम्हाला पुन्हा खेळण्याची संधी दिली नाही. अँजेलो मॅथ्यूजबद्दल सांगायचं तर, मी त्याच्या नेतृत्वाखाली मैदानात आलो आणि त्याने माझ्या नेतृत्वाखाली त्याचा शेवटचा सामना खेळला. माझ्यासाठी हा एक नकोसा दिवस आहे.’